मोठी खळबळ! वांद्रे ‘गरीब नगर’ कारवाईचा बदला घेण्यासाठी मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक गंभीर खुलासे झाले आहेत. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुंबईतील पोलिस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील काही अतिमहत्त्वाची व गर्दीची ठिकाणे होती.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत पाच दिवसात जवळपास 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्यात आली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघडकीस आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Special Cell) केलेल्या तपासात ही अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे.
पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा होत्या लक्ष्यावर
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक गंभीर खुलासे झाले आहेत. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुंबईतील पोलिस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि शहरातील काही अतिमहत्त्वाची व गर्दीची ठिकाणे होती. पोलिसांवर हल्ला करून आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवून शहरात दहशत पसरवण्याचा यामागे मुख्य उद्देश होता.
फोटो, व्हिडिओ आणि विदेशी चॅट्स जप्त
दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या आरोपींकडून अत्यंत महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. या आरोपींच्या मोबाईल आणि इतर उपकरणांमधून मुंबईतील विविध ठिकाणांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो जप्त करण्यात आले आहेत. यावरून त्यांनी शहराची रेकी (टेहळणी) केल्याचे स्पष्ट होते. तसेच, त्यांचे परदेशात बसलेल्या त्यांच्या ‘हँडलर्सशी’ झालेले चॅट्सही (संभाषण) तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत, ज्यावरून या कटाची व्याप्ती आणि गांभीर्य समोर आले आहे.
आयएसआय आणि मुन्ना झिंगाडा रडारवर
या दहशतवादी कटाची पाळेमुळे थेट सीमेपार पोहोचलेली आहेत. पाकिस्तानस्थित गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ (ISI) आणि कुख्यात गुंड मुन्ना झिंगाडा यांच्यासह इतर काही प्रमुख विदेशी सूत्रधारांचा या कटात मोठा सहभाग असल्याचा संशय आहे. या विदेशी हँडलर्सच्या इशाऱ्यावरच आणि आर्थिक मदतीवर मुंबईत हा कट शिजत होता. सध्या तपास यंत्रणा या सर्व मुख्य सूत्रधारांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत.
मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र ATS ‘हाय अलर्ट’वर
हा मोठा आणि भयंकर कट उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिस दल आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (Maharashtra ATS) अत्यंत सतर्क झाले असून त्यांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर कुणी मदत केली होती का? त्यांना राहण्यासाठी किंवा रेकी करण्यासाठी कोणी रसद पुरवली? यासाठी ‘स्लीपर सेल’ आणि लोकल नेटवर्कचीही कसून चौकशी सुरू आहे. दिल्ली स्पेशल सेलच्या या कारवाईमुळे मुंबईवरील एक मोठे संकट तूर्तास टळले आहे.
