वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?; अरविंद सावंतांनी उडवली खिल्ली

| Updated on: Feb 07, 2021 | 6:19 PM

भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाची शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. (arvind sawant slams amit shah over alliance formula)

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?; अरविंद सावंतांनी उडवली खिल्ली
Follow us on

मुंबई: भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाची शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं. असं अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलंय. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. (arvind sawant slams amit shah over alliance formula)

अरविंद सावंत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वचन दिलं होतं की नाही, हे सांगायला शहा यांना सव्वा वर्ष लागलं. यातच कळतंय पाणी किती मुरलंय. ठाकरे कुटुंब नेहमीच खरं बोलतं. त्यावेळेस जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात 50-50चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शहांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला का गेले? मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

मिशन कमळ यशस्वी होणार नाही

बिहारमध्ये हातातून सत्ता जाईल हे त्यांना माहीत होतं. शिवाय त्यांना पाठिंबा द्यायला दुसरा पक्षही बिहारमध्ये नव्हता. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि नितीशकुमारांना पाठिंबा द्यावा लागला, असा टोला सावंत यांनी लगावला. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सर्व राज्यात फोडाफोडीचं राजकारण करत आहे. सत्तेसाठी ते काहीही करतात, असं सांगतानाच राज्यात मिशन कमळ यशस्वी होणार नाही. ठाकरे सरकार पूर्ण कालावधी पूर्ण करेल, असंही ते म्हणाले. भाजप नेते नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला कुठून कुठून लोकं आले होते, याची जरा माहिती घ्या, असंही ते म्हणाले.

शहा काय म्हणाले?

अमित शहा यांनी सिंधुदुर्गात येऊन घणाघाती भाषण केलं. यावेळी त्यांनी आघाडी सरकारची पिसे काढली. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली. आम्ही कुणालाही कसलंही आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही वचन दिलं हे सफेद झूठ आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. मी कधीच बंद कमऱ्याचं पॉलिटिक्स करत नाही. जे आहे ते सडेतोड बोलतो. ठोकून बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतं आश्वासन दिलं नव्हतं. आम्ही बिहारमध्ये नितीशकुमार यांना वचन दिलं आणि ते पाळलंही, असंही ते म्हणाले. उद्धवजी, आम्ही तुम्हाला आश्वासन दिलं म्हणता, मग निवडणुकीतील प्रत्येक भाषणात आम्ही राज्यातील एनडीएच्या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार असल्याचं आम्ही सांगायचो. तेव्हा विरोध का केला नाही. तुमच्या समोरच मी आणि मोदींनीही फडणवीसच राज्याचं नेतृत्व करतील असं अनेकदा सांगितलं. तेव्हा तुम्ही त्याला आक्षेप का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला. (arvind sawant slams amit shah over alliance formula)

 

संबंधित बातम्या:

नारायण राणेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर थेट ‘प्रहार’; अमित शहांच्या भाषणातील 5 घणाघाती मुद्दे

अमित शाहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी: चंद्रकांत पाटील

बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत; अमित शहांची उद्धव ठाकरेंवर थेट टीका

अमित शहांचा शिवसेनेवर थेट वॉर; ‘ऑपरेशन लोट्स’ की ‘मनसे’शी युती?; चाणक्य नीतीमागे दडलं काय?

(arvind sawant slams amit shah over alliance formula)