भीषण युद्धाने अनेकांचे जीवन नासले, कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका, 400 विमा प्रतिनिधी अडकले, मोठी अपडेट काय?
Israel America Iran War: मध्य-पूर्व आशियातील युद्धाचे दुष्परिणाम आता जगभरात दिसून येत आहे. महाराष्ट्रावरही या युद्धाचे परिणाम समोर येत आहेत. राज्यातील अनेक जण दुबईसह आखातातील देशात अडकले आहेत. तर कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Middle East War Onion-Grapes Growers: इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात मोर्चा उघडला आहे. तर सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेणी कुटुंबासह ठार झाल्यापासून इराण चवताळलेला आहे. युद्धा अजून काही महिने चालण्याची भीती वर्तवली जात आहे. या युद्धाने आखाती देशात पर्यटनासाठी, शिक्षणासाठी, कामासाठी गेलेल्या भारतीयांचा जीव धोक्यात आला आहे. इराण आखाती देशांवर मिसाईलने हल्ला चढवत असल्याने सर्वच चिंताग्रस्त झाले आहेत. ताज्या अपडेटनुसार, या युद्धाचा कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे, तर अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे.
कांदा-द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका
आखाती देशातील युद्धाचा नाशिकच्या कांदा, द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. JNPT बंदरावर नाशिकचे कांदा, द्राक्षाचे 200 कंटेनर अडकले आहेत. निर्यातीवर युद्धाचा थेट परिणाम झाला आहे. शनिवारी रात्रीपासून दुबई बंदरावर रजिस्ट्रेशन बंद झाले आहे. JNPT बंदरात कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हजारो टन कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच अडचणीत आलेले कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. निर्यात ठप्प झाल्यास बाजार भाव आणखी गडगडण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुलडाण्यातील नागरिक अडकले
मध्यपूर्व आशियात बुलढाणा जिल्ह्यातील सहा नागरिक अडकले आहेत. सायली दांडगे, रमेश उबरहंडे, गणेश उबरहंडे, बद्रीश्वर पवार, डॉ. पूजा लोखंडे, काश्मिरा शाह अशी मध्यपूर्व आशियातील विविध देशात अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींची नावे आहे . जिल्हा प्रशासनाने या सर्वांशी संपर्क साधला असून सर्वजण सुरक्षित आहेत.. काहीही अडचण असल्यास भारतीय दूतावास सोबत संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या सर्वांची विमाने रद्द झाल्याने या सहा व्यक्ती मध्यपूर्व आशियातील विविध देशात अडकून पडल्या आहेत..
400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले
आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यतील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले आहेत. दुबई सरकारकडून अडकलेल्या भारतीयांची मोफत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्स साठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजराईल युद्धमुळे भारतकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झाले आहेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधीनी केली आहे.
