हा तर पांढरा जिहाद… तर जैन सोसायट्यात… मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं, गिरगावातील वातावरण तापलं
जैन मुनींनी सांस्कृतिक दहशतवाद करू नये. नाही तर जिथे जिथे जैन लोकांच्या सोसायट्या आहे तिथे काळा रंग मारू, असा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांचा वाद विकोपाला गेला आहे. जैन मुनींनी रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यास सुरुवात केली आहे. त्याला मनसेने विरोध केला आहे. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं मनसेने म्हटलं आहे. घाटकोपर, दादर, चर्नीरोडनंतर गिरगावातही पांढऱ्या पट्ट्या आढळून आल्यानंतर मनसेने या पट्ट्यांवर काळा रंग मारण्यास सुरुवात केली. त्याला पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पण आम्ही पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारल्याशिवाय जाणारच नाही. तुम्ही पालिका अधिकाऱ्यांना बोलावून काळा रंग मारा. जैनांची दादागिरी खपपून घेतली जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आणि जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गिरगावमधील वातावरण तापलं.
तर मुंबईचं नाव जैन गाव
मनसेने गिरगावमधील रस्त्यावर मारण्यात आलेल्या पट्ट्यांवर काळा रंग मारण्यास सुरुवात केली आहे. हा पांढरा जिहादच आहे. त्यामुळे तो रोखला पाहिजे. तो ऱोखला नाही तर उद्या हे लोक मुंबईचं नाव जैन गाव करायला कमी करणार नाहीत, असा इशाराही मनसेने दिला आहे.
महापालिकेकडून पोलिसांना पत्र
रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि असे प्रकार घडू नये म्हणून महापालिकेकडून पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. जी/उत्तर विभागातील विविध रस्त्यांवर अनधिकृतरित्या पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने स्पष्ट केले आहे की, संबंधित पट्टे मारण्यासाठी विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच अशा प्रकारच्या कामांना परवानगी देण्याची कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दादर येथील डी.एस. बाबरेकर मार्गासह काही ठिकाणी रस्त्यांवर पांढरे पट्टे मारण्यात आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या मते, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस विभागाने आवश्यक ती कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी जी/उत्तर विभागाकडून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.
