
Sanjay Raut on DGCA And VSR: दिवगंत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. आमदार रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. या विषयावर खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप आणि खळबळजनक दावा केला. त्यामुळे राज्यात मोठा गदारोळाची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
हा सदोष मनुष्यवध
“रोहित पवार काल मला भेटले आणि या हवाई क्षेत्रातील काही तज्ज्ञ, वैमानिक, फिल्डवर काम करणारे तंत्रज्ञ, मी आणि रोहित पवार यांनी चर्चा केला. रोहित पवार यांनी या क्षेत्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांचा अभ्यास थक्क करणारा आहे. दृश्यमानता ते ब्लॅक बॉक्सपर्यंत रोहित पवार यांनी बरीच माहिती दिली. मी ही त्या गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे की सरकार याला अपघात म्हणत आहे, आम्ही त्याला सदोष मनुष्यवध म्हणतो. या घटनेला महाराष्ट्र सराकर, राज्याचे मुख्यमंत्री हलक्यात घेत आहेत. त्यादिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्र्यांना जो आक्रोश फुटला होता, तो खरा की खोटा असा प्रश्न पडला आहे. इतके ही गांभीर्य नाही की एक सहकारी आपण या संशयास्पद अपघातात गमावला आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
तुमचे अश्रू मगरीचे होते का?
काल रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाविरोधात तक्रार घ्यावी यासाठी मागणी केली. ती फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताविषयी एक जवळचा नातेवाईक तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो. आणि तिथे ही तक्रार घेऊ नका यासाठी विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो, हा काय प्रकार आहे, म्हणजे तुमचे जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते, डीजीसीएने अशा अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केल्या आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे पैसे गुंतलेले आहेत. नागरी खात्याचे मंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्याचे प्रमुख आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे संबंध आहेत. इतर महत्त्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीने जाऊ नये, असे राऊत म्हणाले.
कुणी तरी खून केलेला आहे ना?
हा सदोष मनुष्यवध आहे. त्यामुळे रोहित पवार जे सांगत आहेत. पवार कुटुंब जी मागणी करत आहे.आमच्यासारखे दादांचे चाहते जी मागणी करत आहेत की VSR कंपनी आणि DGCA वरती गुन्हा दाखल करा. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुणी तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. एखादा खून झालेला आहे. कुणीतरी खून केलेला आहे ना. खून केलेला आहे, हत्या झालेली आहे, असा बॉम्ब संजय राऊत यांनी टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांना नेमकं काय सुचवायचं आहे असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. पण आज त्यांच्या विधानाने मोठा गदारोळ होण्याची शक्यता दाट आहे.