रेल्वेच्या डब्ब्यातील बेवारस बॅग उघडताच डोळे चमकले, स्वप्नातही पाहिले नव्हते इतके कोटी… मुंबईत काय घडलं?
मुंबईतील वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी चरस जप्त केले आहे. तसेच बोरिवलीत भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी नशेच्या अड्ड्यावर धाड टाकून गांजा ओढणाऱ्यांना पकडले. मुंबई नशा मुक्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि लोकप्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला नशेखोरीचा विळखा बसला आहे. या विळख्यातून मुंबईला मुक्त करण्यासाठी आता मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. सध्या मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रेल्वे पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्रमक पाऊले उचलल्याचे पाहायला मिळत आहे. एका बाजूला वांद्रे रेल्वे टर्मिनसवर पोलिसांनी कोट्यवधींचे चरस जप्त केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला बोरिवलीत भाजप नगरसेवकाने स्वतः मैदानात उतरून नशेचा अड्डा उध्वस्त केला आहे. या दोन्ही कारवाईंमुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. सध्या नशामुक्त मुंबईसाठी पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी संयुक्त आघाडी उघडल्याचे चित्र दिसत आहे.
वांद्र्यात मोठी कारवाई
मुंबईत वांद्रे रेल्वे पोलिसांनी गोरखपूर-मुंबई अवध एक्सप्रेसमधून होणाऱ्या एका मोठ्या चरस तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी दुपारी 4.15 वाजता ही गाडी वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक ४ वर आली होती. असे असताना एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याला जनरल डब्यात एक बेवारस संशयास्पद बॅग आढळली होती. ही माहिती मिळताच रेल्वे पोलीस, आरपीएफ, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या बॅगेची तपासणी केली असता त्यात चरसचे ३१ पॅकेट्स सापडले. या चरसचे एकूण वजन १३ किलो ८३४ ग्रॅम इतके होते. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १३ कोटी ८३ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. मोठा पोलीस बंदोबस्त पाहून आरोपी बॅग सोडून पसार झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान २०२६ या वर्षांत इतक्या मोठ्या चरसचा साठा पकडण्याची रेल्वे पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहेत.
बोरिवलीत दोन तरुणांना चोप
तर दुसरीकडे, बोरिवली पश्चिम येथील ओल्ड एम.एच.बी. कॉलनी परिसर नशेबाजांचा अड्डा बनल्याच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक शिवा शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी स्वतः मध्यरात्री या परिसरात धाड टाकली. या कारवाईदरम्यान दोन तरुण गांजा ओढताना रंगेहाथ पकडले. यावेळी नगरसेवकांनी या तरुणांना चोप देत त्यांच्याकडील गांजाचा साठा जप्त केला. नगरसेवक शिवा शेट्टी यांनी तातडीने भाजप आमदार संजय उपाध्याय यांना व्हिडीओ कॉलद्वारे माहिती दिली. त्यानंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या बोरिवली विधानसभा क्षेत्र नशा मुक्त करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी स्वतः रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. याला बोरिवली पॅटर्न म्हणून ओळखले जात आहे.
