ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांची चांदी, 1 एप्रिलपासून वीज बिल कमी होणार; तुमचे नवीन बिल किती येईल?
मुंबईतील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! १ एप्रिल २०२६ पासून टाटा पॉवर, अदानी आणि बेस्टच्या वीज दरात मोठी कपात लागू होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर MERC ने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा आधार मिळणार असून, तुमचे नवीन बिल किती येईल हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

मार्च महिना संपल्यानतंर राज्यात सर्वत्रच कडाक्याचे ऊन पाहायला मिळते. या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी आपण घरात पंखा, एसी, कुलर अशी उपकरणं दिवसभर वापरतो. परिणामी यामुळे विजेचे बील जास्त येण्याची चिंता सर्वसामान्यांना सतावते. मात्र, आता राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून वीज दरात लक्षणीय कपात लागू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) याबद्दलचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट (BEST), टाटा पॉवर (Tata Power) आणि अदानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity) या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या दरात घट झाली आहे.
नवीन दर कसे असणार?
| वापर (युनिट्स) | BEST (नवे दर) | टाटा पॉवर (नवे दर) | अदानी (नवे दर) |
| ० ते १०० | ₹ ३.८४ | ₹ ४.७० | ₹ ४.९३ |
| १०१ ते ३०० | ₹ ७.१७ | ₹ ७.१० | ₹ ८.१३ |
| ३०१ ते ५०० | ₹ ११.८५ | ₹ ११.६४ | ₹ ९.३८ |
| ५०० पेक्षा जास्त | ₹ १३.०७ | ₹ १२.६४ | ₹ १०.६३ |
बिलात नक्की किती बचत होणार?
या निर्णयानुसार वेगवेगळ्या स्तरावरील ग्राहकांना खालीलप्रमाणे फायदा होईल.
- अल्प वापर (०-१०० युनिट): टाटा पॉवरच्या दरात सुमारे ९.७ टक्के कपात झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा आहे.
- मध्यम वापर (१०१-३०० युनिट): या श्रेणीत साधारण १०.८ टक्के पर्यंत घट झाली असून, सर्वाधिक ग्राहक याच श्रेणीत येतात.
- जास्त वापर (३०१-५००+ युनिट): ५०० युनिटपेक्षा जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी दरात तब्बल १४ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
महावितरणच्या ग्राहकांनाही फायदा
केवळ मुंबईच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या (MSEB) ग्राहकांसाठीही आनंदाची बातमी आहे. आयोगाने मान्य केलेल्या पाच वर्षांच्या (२०२५-२०३०) आराखड्यानुसार, दरवर्षी टप्प्याटप्प्याने वीज दर कमी केले जातील. विशेष म्हणजे, आगामी काळात कोणत्याही प्रवर्गात वीज दर वाढणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे.
हे नवीन दर उद्या १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. त्यामुळे ग्राहकांना मे महिन्यात जे बिल मिळेल, त्यामध्ये या कपातीचा प्रत्यक्ष फायदा दिसून येईल. वाढत्या महागाईच्या काळात वीज दरातील ही घट सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा आधार देणारी ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२६ पासून वीज दरात मोठी कपात जाहीर केली आहे. मुंबईतील टाटा, अदानी आणि बेस्टच्या ग्राहकांना नव्या दरपत्रकामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून मे महिन्याच्या बिलात मोठी बचत होईल.
