
मुंबईतील हाजी अलीजवळ लोटस जेट्टी येथे मोठी दुर्घटना घडली. आईच्या अस्थिविसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या संतोष विश्वेश्वर (५१) आणि त्यांचा मित्र कुणाल कोकाटे (४५) यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले संजय सरवणकर (५८) यांना वाचवण्यात यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही घटना काल (२८ जून) संध्याकाळी घडली. त्यावेळी समुद्राला भरती होती आणि हे तिघे अस्थिविसर्जनासाठी पाण्यात उतरले होते.
काल संध्याकाळी संतोष विश्वेश्वर त्यांच्या आईच्या अस्थिविसर्जनासाठी हाजी अली येथील लोटस जेट्टी येथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कुणाल कोकाटे आणि संजय सरवणकर होते. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या समुद्रात हायटाईड असल्याने उंच लाटा उसळत होत्या. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिघांनाही समुद्रात जास्त पुढे न जाण्याचे आवाहन केले होते. कारण समुद्राला मोठी भरती होती. पण तिघांनीही आपण पालिका अधिकारी असल्याचे सांगत अस्थिविसर्जनासाठी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.
मात्र या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात भरतीच्या लाटांमुळे हे तिघेही समुद्रात ओढले गेले. ही बाब लक्षात येताच, तेथे उपस्थित असलेले पोलीस आणि स्थानिक मच्छीमार यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. या तिघांनाही पाण्याबाहेर काढून त्वरित नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी संतोष विश्वेश्वर आणि कुणाल कोकाटे या दोघांना मृत घोषित केले. तर संजय सरवणकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. विशेषतः संतोष विश्वेश्वर हे एमएसईबीचे कर्मचारी आणि कबड्डी प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि बीडीडी चाळ रहिवासी तसेच प्रकाश गड एमएसईबीमधील कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. तर संजय सरवणकर यांच्यावर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
या घटनेनंतर शिवसेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. डिलाईल रोड, बीडीडी चाळ येथील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक कोकाटे ह्यांचे सुपुत्र कुणाल कोकाटे व राष्ट्रीय कबड्डीपटू संतोष विश्वेकर ह्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. कोकाटे व विश्वेकर कुटुंबियांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती!, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ताडदेव पोलीस स्थानकाच्या श्रीमती राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एका जीवाचे रक्षण होऊ शकले. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, दोन निरपराध जीवांचे निधन दु:खदायक आहे. या घटनेबाबत पुढील तपास ताडदेव पोलीस ठाणे करत आहे. या घटनेमुळे समुद्राच्या भरतीच्या वेळी पाण्यात उतरताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी विशेषतः अशा संवेदनशील प्रसंगी आणि हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.