मुंबईकरांनो काळजी घ्या, लवकरच मोठं संकट कोसळणार, इशारा काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आल्याने मुंबईत ६ टक्के पाणी कपातीचा इशारा; महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. सध्या धरणांमध्ये केवळ ३२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीचा इशारा दिला आहे. मुंबईत संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात ६ टक्के पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या जलाशयांमध्ये केवळ ३२ टक्के पाणी उपलब्ध आहे. पाण्याचे नियोजन पाहता ६ टक्के पाणी कपातीचा इशारा देण्यात आला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाचा अंदाज आणि तयारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन ३१ जुलैपर्यंत होण्याचा अंदाज आहे. जोपर्यंत पावसाळ्याला सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपलब्ध पाणीसाठा योग्य पद्धतीने वापरणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या काळात पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरीही नागरिकांनी पाणी साठवून ठेवताना आणि वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे पाणी बचतीसाठी नागरिकांनी घरामध्ये पाण्याचा जपून वापर करावा, अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि स्थानिक पातळीवर पाणी टंचाईच्या तक्रारी असल्यास पालिकेशी संपर्क साधावा, असेही महापौरांनी सुचवले आहे.
धरणांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये):
- भातसा: २,३५,४३९
- मध्य वैतरणा: ६९,१०६
- अप्पर वैतरणा: ७७,०४५
- तानसा: ४०,८१७
- मोडक सागर: ४५,३४०
- विहार: १५,३५३
- तुळशी: ३,२७४
भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा
दरम्यान मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. १५ एप्रिल २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे आणि अल-निनो या हवामान बदलाच्या परिणामामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे संकट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्यास सुरुवात करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे.
