
Hasan Mushrif on NCP : अजितदादांच्या अकाली एक्झिटने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादी पक्षाचं अपरिमित नुकसान झालं. तरीही चौथ्या दिवशी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. घरात दु:खाचे सावट असताना घाई घाईत घेतलेल्या शपथविधीवरून टीका झाली. संशय व्यक्त झाला, नाराजीही व्यक्त झाली. इतर पक्षातील अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य केले. हा प्रकार अनेकांना रुचला नाही. तर विलीनीकरणाबाबतही अजितदादांच्या पक्षातील काही बडे नेतेच खोडा घालत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यावरून आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा इशारा दिला आहे.
आमचा पक्ष वेगळा, लुडबुड थांबवा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळीच कोल्हापूरात मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयावर संवाद साधला. तर राष्ट्रवादी पक्षातील घाडमोडींवर इतर पक्षातील नेते जे भाष्य करत आहेत. त्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी आमचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यात आता कुणीही लुडबुड करू नये, असा इशारा त्यांनी दिला. आमच्या दु:खाच्या प्रसंगात, आम्ही शोकसागरात बुडालो आहोत. असं असतानाही ही मंडळी आम्हाला का डिवचत आहेत याची मला शंका आहे असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
मग ते व्हिलन कसे?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेच पक्षाला चालवत असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. तर त्यांच्यामुळे घाईघाईत शपथविधी करण्यात आला. विलीनीकरणातही त्यांचाच खोडा असल्याची टीका इतर पक्षातील नेतेमंडळी वारंवार करत आहेत. त्याकडं मुश्रीफ यांचं माध्यमांनी लक्ष वेधलं असता, त्यांनी याप्रकरणी सडेतोड भूमिका मांडली.
अजितदादांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांना चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आता मला सांगा, प्रफुल पटेल यांनी अनेक वर्ष शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे. ते पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत.सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. दादांच्या अचानक जाण्यानं मग पक्षाची बैठक कोणी बोलावायची? विधीमंडळाची बैठक अध्यक्षच बोलवतील ना, सुनील तटकरे यांनी ती बैठक बोलावली. प्रफुल पटेल यांनी ती बोलावली. मग तटकरे आणि पटेल व्हिलन कसे? असा सवाल त्यांनी विचारला. जर त्यांनी बैठक बोलावली आणि सुनेत्रा पवार यांनाच त्यांनी उपमुख्यमंत्री केलं तर ते व्हिलन कसं ठरू शकतात असा उलट प्रश्न त्यांनी केला. तर या दोघांना कोण व्हिलन ठरवू पाहत आहेत , याप्रश्नावर त्यांनी माध्यमांवर चेंडू टोलावला. तर या अपघाताची चौकशी सुरू आहे. अपघाताचा अहवालही लवकरच समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत आम्ही नव्हतो असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.