Rohit Pawar: रोहित पवारांच्या जीवाला कुणाकडून धोका? पवार कुटुंबांला मोठी चिंता, अपडेट काय?

Rohit Pawar Life Threating: अजितदादांच्या विमान अपघातात काळंबेरं असल्याचा दावा आमदार रोहित पवार सातत्याने करत आहेत. वैमानिकाचा वापर करून घातापात घडवल्याचा त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पुराव्यांचा क्रम लावत काही गोष्टी इंगित केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती पवार कुटुंबियांना सतावत आहेत.

Rohit Pawar: रोहित पवारांच्या जीवाला कुणाकडून धोका? पवार कुटुंबांला मोठी चिंता, अपडेट काय?
रोहित पवार, अजित पवार
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 8:59 AM

Rohit Pawar-Ajit Pawar-Supriya Sule: अजितदादांचा विमान अपघात की घातपात असा सवाल केल्या जात आहे. आमदार रोहित पवार यांनी तर पुराव्यांची मालिका समोर आणत, घटनाक्रम जुळवत वैमानिकांच्या मदतीने हा घातपात घडवल्याची शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर सकाळी अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. रोहित पवारांनी हा मुद्दा सुरुवातीपासून लावून धरला. खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनी सुद्धा या प्रकरणी संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार अनेक उच्चपदस्थांची नावे घेत आहेत अथवा त्याकडे काहीतरी इंगित करत आहेत. या भूमिकेने त्यांच्या जीवाला धोका होण्याची भीती पवार कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवारांच्या दाव्यांनी खळबळ

अजितदादांचा मृत्यू विमान अपघातात झाला की तो घातपात आहे याबाबत रोहित पवारांनी दोन पत्रकार परिषद घेतल्या. त्यात त्यांनी प्रेझेन्टेशन सादर केले. त्यांनी पुराव्यासह बाजू मांडली. VSR कंपनीच्या एकूणच कारभारावर आणि तिला वाचवणारे स्टेकहोल्डरवर त्यांनी सडकून टीका केली. कंपनीचा मालक कुठे फरार झाला. तर त्याच्याशी कोणकोणत्या पक्षाच्या वरिष्ठांचे संबंध आहे इथपर्यंत त्यांनी पुरावे मांडले. तर एका खासदाराचे व्हीएसआर कंपनीत भागीदारी असल्याचाही दावा केला. या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचले आहेत, याचे विश्लेषण त्यांनी पत्रपरिषदेतून केले.

तपास यंत्रणांच्या संथगतीवर टीका

त्यांनी याप्रकरणी तपास यंत्रणांच्या कारभारावर आणि संथगतीवरही टीका केली. अगोदर ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा करणारी यंत्रणा रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मात्र वठणीवर आल्याचे दिसत आहे. डेटा डाऊनलोड केल्याचा दावाही समोर येत आहे. एकूणच तपास यंत्रणांवर कुणाचा तरी दबाव असल्याचे रोहित पवारांचं म्हणणं खरं आहे का असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वसामान्यांनी हा घातपात आहे की अपघात यावर बोलण्यास सुरुवात केली. हा विषय लावून धरला. ते बोलत होते.

दादांना उशीर का झाला?

पहिल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसर्‍या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती असे म्हटले. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे. फाईलवर मुद्दामहून तिथल्या तिथं स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं असा दावा त्यांनी केला होता.

रोहित पवारांना कुणाकडून धोका?

रोहित पवार ज्या अर्थी उच्च पदस्थांवर आणि यंत्रणांवर सडकून टीका आणि आरोप करत आहेत, त्यावरून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पवार कुटुंबियांचा सध्या तरी सूर दिसत आहेत. पण रोहित पवारांच्या जीवाला कुणाकडून धोका आहे ,याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. पण रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या कुटुंबाला भीती वाटत असल्याचे समोर आणले. पत्नी, मुलं, आई, सासरे आणि नातेवाईकांना माझ्या जीवाला धोका असल्याची भीती वाटत असल्याचे ते म्हणाले. पण घाबरून प्रश्न विचारणं सोडून देता येणार नाही असे ते म्हणाले.

तर खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार हे अभ्यासूपणे हे प्रकरण लावून धरत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारने सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. तर विमान अपघाताच्या बाबत येणार्‍या अहवालाबाबत आम्ही हट्ट धरला होता. संसदेत आम्ही हा विषय मांडला असून संसदेत आम्ही उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.