
Rohit Pawar on Ajit Pawar: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात राज्यातील 7 जागांचाही समावेश आहे. पुढील महिन्यात ही निवडणूक होत आहे. तर 2 एप्रिल रोजी राज्यसभेतील सध्याचे काही खासदार निवृत्त होत आहेत. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरण झाले असते तर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार होते असा दावा ही करण्यात येत आहे. तर या चर्चांदरम्यान आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत एक मोठा दावा केला आहे. राज्यसभेवर कुणाला पाठवायचे हे दादांनी मनात पक्कं केलं होतं, याविषयीचा खुलासा रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद
अजितदादांचा विमान अपघात की घातपात याविषयीवर रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद नवी दिल्लीत घेतली. अपघातानंतर काही पुरावे सादर करत त्यांनी याविषयीचा मोठा दावा केला आहे. वैमानिकाचा वापर करून हा अपघात घडवून आणल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय नागर उड्डयन मंत्री किंजरापू राममोह नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेलगू देसमचे नेते आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे घनिष्ठ संबंध असल्याने तपास निष्पक्ष होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आज त्यांनी काही खुलासे आणि पुरावे समोर आणतानाच अजितदादांच्या मृत्यूमागे घातपाताची शंका व्यक्त केली.
राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार
आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा विचार होता. विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी कुठलीही अट टाकली नव्हती. दादांसाठी दोन्ही पक्ष एकत्र यावे हा राजकीय प्रश्न नव्हता तर भावनिक प्रश्न होता. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे अशी अजित दांदांनी इच्छा व्यक्त केली होती, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचा दावा त्यांनी निकाली काढला आहे.
अमोल कोल्हे यांचा दावा काय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते असे अजितदादांन आम्हाला सांगितले होते असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. भुजबळ हे मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती. विशिष्ट जातीनिहाय जनगणना होत असताना ओबीसींचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही अशा परिस्थितीत भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्टी होती. या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. त्यानंतर आज रोहित पवारांनी वेगळाचा खुलासा केला आहे.