डंके की चोट पर सांगतो, मनोज जरांगे आता… गुणरत्न सदावर्ते यांचा सर्वात मोठा दावा काय?
गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. २० दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे यांचा ‘रिॲलिटी शो’ संपला असून, ते आता कधीच राजकीयदृष्ट्या उभे राहणार नाहीत असा सदावर्ते यांचा दावा आहे. आरक्षणाच्या मागण्या घटनाबाह्य असून, एका समाजाला तीन वर्गात मागास घोषित करता येत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी निजामी कागदपत्रे अवैध ठरवली.

मनोज जरांगे यांनी गेल्या 20 दिवसांपासून रिअॅलिटी शो सुरू केला होता. आज सकाळी हा शो फायनल झाला. जरांगेंच्या रिअॅलिटी शोचा सीजनही संपला. डायरेक्टर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर प्रोड्युसर उदय सामंत होते. त्यामुळेच हा शो फ्लॉप गेला. जरांगे मुंबईला येणार नाहीत हे मी कालच सांगितलं होतं, असं सांगतानाच मनोज जरांगे आता कधीच मान वर काढणार नाहीत हे मी डंके की चोट पर सांगतो, असा दावा प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 20 दिवसानंतर उपोषण मागे घेतलं आहे. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जरांगे यांच्या निर्णयानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तीन महिन्यांचा अल्टिमेटम देणाऱ्या मनोज जरांगेंना गणपती भक्तांचा एक डोस मिळाला. जरांगे आता दवाखान्याकडे निघाले आहेत. प्रोड्युसर-डायरेक्टर दवाखान्याचं बिल देतील की नाही, हे पाहावं लागेल, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
अल्टिमेटम चालणार नाही
जरांगे हे सरड्यासारखे रंग बदलत आहेत. तरुणांना समोर बसवून मोजणी करण्याचं नाटक केलं. नोंदी वगैरे दाखवून रिअॅलिटी शोचं नाट्य तयार केलं. हा सगळा खेळ मोजणीवर आधारित होता. तीन महिन्यांच्या अल्टिमेटमला वैचारिक किंमत नाही. मुंबईत अल्टिमेटमसारखे शब्द चालणार नाहीत. या देशात आणि राज्यात अल्टिमेटम चालणार नाही, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला.
तीन वर्गात मागास घोषित करता येत नाही
धर्मविरोध आणि लबाडी चालणार नाही. जरांगे यांनी गाशा गुंडाळला आणि पुन्हा रवाना झाले. रिअॅलिटी शोच्या सीझनचा पडदा पडला, खेळ संपला. आता जरांगे यांच्या बोलण्याला कवडीची किंमत नाही. निजामांच्या कागदांवर जात प्रमाणपत्र मिळू शकत नाही. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत एका समाजाला तीन-तीन वर्गांमध्ये मागास घोषित करता येत नाही. एका वर्गाला एकाच ठिकाणी जाता येतं, असंही त्यांनी सांगितलं.
गुलाल उधळलाच नाही
हेकडी कलाकाराला किती वेळा प्रोड्युसर-डायरेक्टरने सांभाळायचं? आजही जरांगे हेकडीच्या भाषेत बोलत आहेत. त्यांना ईडीचा डोस बसला आहे. उशिरा का होईना त्यांचे डोळे उघडले. जरांगे यांचं आता पानिपत झालं. आता त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मागच्या वेळी गुलाल उधळला, यावेळी गुलाल उधळण्याचा लपंडावही झाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
