
बेगानी शादीत ठाण्याच्या अब्दुलाचं काय काम? असा रोखठोक सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. काल दोन्ही शिवसेनांनी वर्धापन दिन साजरे केले. त्यात दोघांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळजळीत उत्तर दिले. त्यावर आज राऊतांनी त्यांच्या शब्दाची नोंद घेतल्या गेल्याचे म्हटले आहे. त्याला शिवसेना खास उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. इतकेच नाही तर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर त्यांचा इतका तिळपापड का होत आहे, असा रोकडा सवाल त्यांनी केला.
जनता कोणाला मारते हे कळेलच
मेलेल्यांना काय मारायचे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती. त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतला. कालच्या शिंदेंच्या उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या विधानाची शिवसेनेने नोंद घेतल्याचे ते म्हणाले. त्याला शिवसेना उत्तर देईल, असे ते म्हणाले. राज्यातील जनता कोणाला मारते हे येत्या काळात कळेल असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ठाण्याच्या अब्दुलाचा काय संबंध?
दोन ठाकरे एकत्र येत आहेत. तर यांचा इतका का तिळपापड होत आहे, असा रोकडा सवाल खासदार राऊत यांनी यावेळी विचारला. हे सरकार विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर जिवंत असल्याचा टोला त्यांनी लगावला. दोन ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून यांना झोप लागत नसल्याचा घणाघात त्यांनी घातला. यांची अघोरी विद्या, पूजा, रेड्याची कापलेली शिंग याचा काही उपयोग होत नाही. कापलेल्या रेड्याची साथ मिळत नाहीये. आमचं आम्ही बघू रे बाबा, तुम्ही बघा फडणवीसांनी तुमची काय अवस्था करून ठेवली आहे. पाय पुसणं केलं आहे तुमचं, पोतेरं केले आहे आणि लवकरच मातेरं पण होईल तुमचं. मला माहिती आहे, तुमची काय अवस्था आहे ती. रात्री झोप लागत नाही या लोकांना. करवटे बदलते रहते है. हे लोक रात्री तळमळतात. आमचे काय होईल ही यांना चिंता लागलेली आहे, असा घणाघात राऊतांनी घातला.
ठाकरे ब्रँड कोणीच संपवू शकत नाही
राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी वारंवार सकारत्मक संकेत दिले आहे. या युतीबाबत ते आशावादी आहेत. शिवसेनेची भूमिका सकारात्मक आहे. मराठी माणसाची एकजूट या देशात नवीन ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्याविना देशाचा गाडा न चाले, या ओळी उद्धृत करत त्यांनी ठाकरे हा देशातील सुप्रीम ब्रँड असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे असतील. देवेंद्र फडणवीस, अमित शाह असतील, कोणालाही हा ब्रँड डॅमेज करता येणार नाही असे राऊत म्हणाले.