Gauri Ganpati | सण गौरी गणपतीची आयलाय गो! चाकरमान्यांची कोकणात गर्दी, सिंधुदुर्ग आगार प्रवाशांसाठी सज्ज
Gauri Ganpati | गौरी गणपतीच्या सणाला सिंधुदुर्गासह कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची भाऊगर्दी उसळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग बस आगार त्यासाठी सज्ज झाले आहे.
Gauri Ganpati | कोरोनाच्या (Corona) दोन वर्षांच्या सावटानंतर यंदा गौरी गणपतीचा सण (Gauri Ganpati Festival) मोठ्या धु्मधडाक्यात कोकणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी चाकरमान्यांनी तयारी ही करुन ठेवली आहे. गणपती आगमनास आता अवघा आठवडा उरला आहे. त्यामुळ मुंबईतील चाकरमान्यांची लगबग सुरु झाली आहे. या उत्सवाच्या वातावरणात एसटी महामंडळाने (ST Corporation) कंबर कसली आहे. सर्वसामान्य नागरिकांची प्रवासात गैरसोय होऊ नये आणि त्यांना ताटकळत रहावं लागू नये यासाठी सिंधुदुर्ग आगारही सज्ज झालं आहे. सिंधुदुर्ग बस डेपोने (Sindhudurg Bus depo) प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेसची कुमक मागवली आहे. चाकरमान्यांसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कुर्ला ते सावंतवाडीदरम्यान कोकण भवन, वाकण फाटा, लोणेरे फाटा, कशेडी, संगमेश्वर, तराडा या ठिकाणी एसटीचे दुरुस्ती पथक तैनात असेल
जादा बसेसचा ताफा
सिंधुदुर्ग आगारात 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात 191 जादा बसेस दाखल होणार आहेत. तर परतीसाठीही 4 ते 11 सप्टेंबर या कालावधीसाठी 127 गाड्या तैनात ठेवण्यात आल्या असून आतापर्यंत 54 गाड्यांची बुकींग झाल्या असून 73 गाड्या आरक्षित आहेत. यावर्षी ग्रुप बुकिंगसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रुप बुकिंग झाल्यास गावागावात गाड्यांची सोय करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग विभाग सज्ज
कोरोना कालखंडानंतर आता राज्य परिवहन महामंडळाचा सिंधुदुर्ग विभाग गौरी गणपतीच्या सणासाठी सज्ज झाला आहे.तसेच दररोज नियमित नऊ गाड्याही उपलब्ध आहेत तसेच रेल्वे स्थानकांवरून नियमित व जादा गाड्यांच्या वेळेत बसेसचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. प्रवाशांनी एस टी महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करण्याचे आवाहन सिंधुदूर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले आहे.
मुंबईतूनही बसेसचे विक्रमी आरक्षण
गणेशोत्सवात भर घालण्यासाठी मुंबईतील एसटी महामंडळाही सज्ज आहे. गणेशोत्सवासाठी एसटीचे विक्रमी आरक्षण (reservation ) झाले असून यंदाच्या उत्सवासाठी 2,934 गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे तर 427 गाड्यांचे आरक्षण सध्या सुरू आहे. कोरोनापूर्व काळात म्हणजे 2019 रोजी 2,130 बस आरक्षित झाल्या होत्या. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागांतून एकूण 3,361 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 22 ऑगस्टपर्यंत गावी जाण्यासाठी 1912 बस समूहाने आणि 1022 बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत. कोकणातून परतण्यासाठी 854 गाड्यांचे आरक्षण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
दुरुस्तीसाठी टीम
कुर्ला ते सावंतवाडीदरम्यान कोकण भवन, वाकण फाटा, लोणेरे फाटा, कशेडी, संगमेश्वर, तराडा या ठिकाणी एसटीचे दुरुस्ती पथक तैनात असेल. मुंबई -गोवा महामार्गाची स्थिती पाहता, प्रत्येक आगार आणि स्थानकात 10 अतिरिक्त टायर तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण रेल्वे किंवा मध्य रेल्वे मार्गावर पावसामुळे दरड कोसळून आप्तकालीन स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून 100 बस राखीव असतील.