Suresh Dhas : …अन् सुरेश धस रिकाम्या हातानेच परतले…अजितदादांनी टाळली भेट, जिल्हा नियोजन समितीच्या भ्रष्टाचाराला खो?
Suresh Dhas Ajit Pawar Meeting : जिल्हा नियोजन समितीच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारीसाठी भाजपा आमदार सुरेश धस हे आज अजितदादांना भेटणार होते. त्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. पण त्यांना दादांनी भेट टाळल्याचे समोर येत आहे.

बीड जिल्ह्यातील एकामागून एक प्रकरणं समोर येत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे पदाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण, पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर घोटाळा आणि इतर अनेक घोटाळे चव्हाट्यावर आले. तर आता जिल्हा नियोजन समितीमधील विविध कामात भ्रष्टाचाराचे पेव फुटल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. यासंदर्भातील तक्रार आणि खुलासा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून करणार होते. पण दादांनी त्यांना भेट टाळल्याचे समोर येत आहे.
दादांनी भेट टाळली
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून सुरेश धस हे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची च्या कामांमध्ये भ्रष्टाचार हा कसा झाला आहे याची माहिती देणार होते. उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना भेटीची वेळ दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांनी भेट टाळली. सुरेश धस हे आपल्या पीए च्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्यालयाला पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरेश धस यांना आज भेटीची वेळ अजित पवार यांनी दिली नसल्यामुळे सुरेश धस हे बीडकडे आज सकाळी रवाना झाले आहेत.
काय होती मागणी?
अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस २०१९ पासून ते २०२४ पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. यासंदर्भातील पत्र आज सुरेश धस हे अजित पवार यांना देणार होते. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडला निघून गेले
सध्या अजित पवार यांनी चौकशी समितीला केवळ २०२३-२४ या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात झाल्याचा गंभीर आरोप आमदार धस यांनी केला आहे. विशेष म्हणजे धस यांच्या वतीने आधीच ७२ कोटी रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत. आता या नवीन घडामोडींमुळे भ्रष्टाचाराला खो मिळतो की याप्रकरणात तडक कारवाई होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे.
