मालाडमध्ये भिंत कोसळून 21 जणांचा मृत्यू
मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यातील मृतांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. तर जवळपास 75 जण जखमी झाले आहे.
मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यातील मृतांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. तर जवळपास 75 जण जखमी झाले आहे. या सर्व जखमींवर शताब्दी, ट्रामा केअर सेंटर, कुपर, एम.डब्ल्यू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान भिंत कोसळून भीषण दुर्घटना झाली होती, त्यात 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मुंबईतील मालाड परिसरात भिंत कोसळून 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai: 12 dead and 13 injured after a wall collapsed on hutments in Pimpripada area of Malad East due to heavy rainfall. Many feared trapped under the debris. Injured have been shifted to nearby hospitals. NDRF team present at the spot; rescue operations underway. #Maharashtra pic.twitter.com/wd18wiVeYM
— ANI (@ANI) July 1, 2019
दरम्यान सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. गेल्या पाच दिवसापासून मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागात तर पाणी साचत आहेच, पण अनेक घरातही पाणी शिरलं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळल्याने एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 75 जण जखमी झाले आहेत. यात जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात 7 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर आहेत. तर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात 9 जण, तर मालाडच्या एम. डब्ल्यू रुग्णालयात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालय 19, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालय 52, परेलच्या केईएम 2, अंधेरीच्या कुपर रुग्णालयात 2 जणांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मालाड सबवे येथे 10 ते 12 फूट पाणी साचले होते. असं असताना देखील या ब्रिज खालून स्कॉर्पिओ कारने प्रवास करणाऱ्या दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 6 तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन जवान आणि स्थानिकांनी पहाटे 4 वाजता स्कॉर्पिओ बाहेर काढली.