मिरवणुकीत गेला, घरी न आल्याने कुटुंबियांनी तक्रार केली…; 36 तासांनी समोर आलं भयानक सत्य
नागपूरमध्ये १४ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हात-पाय बांधून त्याचा मृतदेह पोत्यात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम आणि पोलीस तपासाची माहिती येथे वाचा.

सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अथर्व दिलीप नानोरे असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. सुरुवातीला अथर्वचे अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करत त्याचा मृतदेह एका गोणीत भरून फेकून दिल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी २ एप्रिलला अथर्व हा बेपत्ता झाला होता. २ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान परिसरात मोठी मिरवणूक निघाली होती. अथर्व सायंकाळच्या सुमारास या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडला. पण तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. यानंतर मग त्याच्या पालकांनी सर्व नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी केली. मात्र त्याचा कोणताही पत्ता न लागल्याने पालकांनी त्याच रात्री गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र तपास संथ गतीने सुरु असल्याचा आरोप पालकांनी केला.
अर्थवच्या अपहरणाला ३६ तास उलटून गेले होते. यानंतर शनिवारी सकाळी कळमेश्वर मार्गावरील भरतवाडा पुलाजवळ स्थानिकांना एक पांढरे पोते संशयास्पद अवस्थेत दिसले. त्यातून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हे पोते उघडले असता, त्यात अथर्वचा मृतदेह आढळून आला.
यावेळी मारेकऱ्यांनी अथर्वची हत्या करताना अत्यंत क्रूरतेचा कळस गाठला होता. मृतदेह सापडला तेव्हा अथर्वचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी ओरखडे आणि मारहाणीच्या खुणा होत्या. अथर्वचा गळा दाबून हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक वैद्यकीय अंदाज आहे. अथर्वच्या हत्येनंतर त्याची ओळख पटू नये आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणे सोपे जावे, म्हणून त्याला पोत्यात कोंडून निर्जन स्थळी फेकण्यात आले.
परिसरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण
अथर्वचा मृतदेह गिट्टीखदान भागात आणल्यानंतर परिसरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण झाले होते. संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत घोषणाबाजी केली. “जर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून शोध घेतला असता, तर कदाचित अथर्व आज जिवंत असता,” अशा भावना स्थानिकांनी व्यक्त केल्या. यावेळी जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दंगा नियंत्रण पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.
संपूर्ण नागपूर शहर शोकसागरात
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांनी ५ विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या ठिकाणापासून ते मृतदेह सापडलेल्या ठिकाणापर्यंतच्या मार्गावरील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तासनतास फुटेज तपासले जात आहे. काही संशयास्पद दुचाकीस्वारांची हालचाल पोलिसांच्या रडारवर आहे. तसेच पोलिसांनी अथर्वच्या कुटुंबाची कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक किंवा व्यावसायिक दुश्मनी होती का, या दिशेनेही चौकशी सुरू केली आहे. ज्या पद्धतीने मुलाला निर्जनस्थळी नेण्यात आले, त्यावरून एखादी ओळखीची व्यक्ती यात सामील असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. मात्र या निष्पाप मुलाच्या हत्येने संपूर्ण नागपूर शहर शोकसागरात बुडाले आहे. त्यामुळे ही हत्या कोणी केली, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
