अन् 35 प्रवाशांचे वाचले प्राण, नागपुरात भयानक दुर्घटना, चालकाने सांगितला थरार
अकोला-नागपूर बसला आज भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झालीय.

नागपूर : नाशिकमध्ये बसला भीषण आग लागल्याची घटना ताजी असताना आज नागपुरात देखील तशीच एक घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या दुर्घटनेत बस जळून खाक झालीय. बसचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. या दुर्घटनेमुळे प्रवासी प्रचंड बिथरले आहेत. बसमधून उतरायला थोडा जरी उशिर झाला असता तर हाहाकार उडाला असता. पण बस चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना नेमकी कशी घडली याचा थरार बसचालकाने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितला.
अकोला-नागपूर बसला आज भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झालीय. या बसमध्ये जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते. गाडी चालत असतानाच इंजिनमधून आवाज आला. यावेळी चालकाने प्रसंगावधान साधत बस लगेच रस्त्याच्या कडेला घेतली आणि गाडी थांबवली. पण त्यानंतर लगेच गाडीने पेट घेतला.
यावेळी मोठी खळबळ उडाली. बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. काही प्रवासी थेट खिडकीतून उडी मारुन बसबाहेर उतरले. अतिशय थरारक हा सगळा प्रकार होता. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली ते समजू शकलेलं नाही.
‘टायरची हवा सुटल्यासारखा आवाज आला आणि…’
“दुपारी चार वाजता ही दुर्घटना घडली. टायरची हवा सुटल्यासारखा आवाज आला. त्यामुळे मी लगेच गाडी रस्त्याच्या कडेला लावली. गाडी रस्त्याच्या कडेला उभी करताच तिने लगेच पेट घेतला”, अशी प्रतिक्रिया बस चालकाने दिली.
“इंजिनमधून गाडीने पेट घेतला. गाडीत 35 प्रवासी होते. गाडीला आग लागताच कुणी खिडकीतून तर कुणी दरवाजातून, मिळेल तिथून बाहेर पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीच जखमी झालं नाही”, असं बस चालकाने सांगितलं.
