विकासकामे करताना पक्ष पाहू नये, शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

| Updated on: Nov 17, 2021 | 6:12 PM

शरद पवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामं केलीत. विकासकामं करताना गडकरी पक्ष पाहात नाही. याचप्रकारे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नेत्यांनी काम केलं असतं तर व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सुटल्या असत्या असे ते म्हणाले.

विकासकामे करताना पक्ष पाहू नये, शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
Sharad Pawar
Follow us on

नागपूर : विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या. विकासकामे करताना पक्ष पाहू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंतर त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. व्यापाऱ्यांना भेटल्यानंतर ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, आमच्या भागात उसाचे मोठं उत्पादन होते. सहकाराच्या माध्यमातून आम्ही अनेक साखर कारखाने खरेदी केले. राज्य चालवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. राज्यातील जनतेनं मला चार वेळा मुख्यमंत्री केले. राज्य चालवायची संधी मिळते तेव्हा मुख्यमंत्र्यांना सर्व राज्यांकडे बघावे लागते. पण मुख्यमंत्री ज्या भागातून आला त्या भागाकडे कल जास्त असतो.

अधिवेशनात समस्या सोडविण्याचे आश्वासन

शरद पवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाची अनेक कामं केलीत. विकासकामं करताना गडकरी पक्ष पाहात नाही. याचप्रकारे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नेत्यांनी काम केलं असतं तर व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या सुटल्या असत्या असे ते म्हणाले.
पाच सहा व्यापाऱ्यांचं डेलीगेशन तयार करून, यापैकी काही समस्या सोडवता येतील.
१० दिवसांत संसदेचं अधिवेशन सुरु होईल. १० दिवसांत व्यापाऱ्यांच्या समस्यांची नोट मिळाली, तर राज्य सरकराकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कायदा हातात घेणे योग्य नाही

अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये काही समस्या उद्भवली. त्रिपुरात काही घडलं त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात होणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंसेच्या घटना घडवण्यासाठी कायदा हातात घेणं योग्य नाही. महाराष्ट्रातील वातावरण खराब करणं योग्य नाही, याचा व्यापारावर मोठा परिणाम होतो, असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले. अमरावतीत ज्यांची दुकानं फोडली गेली त्यात त्यांचा काय दोष? त्रिपुराच्या घटनेत व्यापाऱ्यांचा काय दोष, असा सवालही त्यांनी केला. संपामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. याबाबत सरकारने काही धोरणं आखणं गरजेचं असते. हिंसक घटनांमध्ये दुकानांचं नुकसान झालं यांच्या मदतीसाठी धोरण आखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युनियन चालवणाऱ्या लोकांनी तुटेपर्यंत ताणू नये. उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी याचा विचार करायला हवा, असा सल्लाही पवार यांनी दिला.

शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य

शरद पवार यांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत, जमावबंदी असताना कार्यकर्त्यांची गर्दी