Sanjay Raut : महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून राऊत इतके चिडले की, त्यांनी तडक त्या IAS अधिकाऱ्याला झापलं, बावनकुळेंना करावा लागला फोन
Sanjay Raut : "शिवसेना या विषयावर आंदोलन करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर माझा विश्वास आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यातून मार्ग काढू असं सांगितलय. कमलाबाईं सारख्या आजीबाई आहेत, त्यांचं तुम्हाला ऐकावं लागेल. परत जर या भगिनी तक्रार घेऊन माझ्याकडे आल्या, तर नाशिकमध्ये वेगळा प्रकार घडेल" असा सरळ इशारा संजय राऊत यांनी दिला.

“माझा मुक्काम नाशिकला आहे. आज सकाळी माझी वेळ घेतली होती. रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत, त्यांच्यावर काही अन्याय होतोय. म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव कोरजे यांनी शेतकऱ्यांना मला भेटायचय आहे असं सांगितलं. त्यानुसार हे सर्व शेतकरी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला. तो पर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहित नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले. “ठीक आहे, जमीन भूसंपादन होत असतं, विरोध होत असतो. कमलाबाई धोडींराम खिरकाडे या आजीबाई आल्या. त्यांनी मला त्यांचा हात दाखवला. इतर महिला भगिनी सगळ्या आल्या. त्यांनी त्यांच्या अंगावरचे, हातावरचे, पाठिवरचे मारहाणी व्रण मला दाखवले. ते पाहून मी अस्वस्थ झालो” असं संजय राऊत म्हणाले.
“मी त्यांना विचारलं हे कोणी केलं? त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेतलं. त्याचे व्हिडिओ दाखवले. त्याच्या हातात काठी आहे, तो दादागिरी करताना दिसतोय. महिला, पुरुषांना जमिनी ताब्यात घेण्यासाठी जबरदस्ती करतोय. ज्या पद्धतीने मारहाण झाली, मी पवन दत्ताला फोन केला, म्हटलं काय चाललय? मारहाणीचा अधिकार कोणी दिला? तुमच्या IAS ट्रेनिंगमध्ये जबरदस्तीने भूसंपादन करताना वृद्ध महिलांना अशा मारहाणीचं ट्रेनिंग दिलय का? मला पंतप्रधानांना विचारावं लागेल” असं संजय राऊत यांनी त्या अधिकाऱ्याला खडसावलं.
चंद्रशेखर बावनकुळेंचा फोन आला
“मग आमचं डेलिगेशन तिथे गेलं. चर्चा सुरु असताना ते महाशय पळून गेले. मी ताबडतोड इथे आलो. जिल्हाधिकारी दुसऱ्या बैठकीला गेलेले. आम्ही सुद्धा थांबलो. तासभर वाट पाहिली. त्यांची पूर्वनियोजित बैठक होती. दरम्यानच्या काळात मला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला. त्यांनी सुद्धा या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी अत्यंत संवेदनशील भाषेत मला सांगितलं, तुम्ही म्हणताय हे जर खरं असेल, तर मी स्वत: लक्ष घालून हा विषय संपवतो” असं संजय राऊत म्हणाले.
‘धर्म ध्वजा फडकवला, त्याचं काही पावित्र्य आहे की नाही?’
“जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सदगृहस्थ आहेत. त्यांनी प्रयत्न करतो असं सांगितलं. सकाळी 7 वाजता सरकार कामाला लागलं. 7 वाजता लोकांच्या घरात घुसले. महिला आंघोळीला गेलेल्या. महिला कपडे बदलत होत्या. कोणत्या परिस्थितीत त्यांच्यावर हल्ले केले? प्रशासनातल्या अधिकाऱ्यांन लाज वाटली पाहिजे. तुम्ही काल नाशिकमध्ये धर्म ध्वजा फडकवला. त्याचं काही पावित्र्य आहे की नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
