‘आशिष कुरेशी’ उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी शेलारांना डिवचलं; वाचा…
Sushma Andhare on Ashish Shelar in Shivsena Mahaadhiveshan : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनात भाषण केलं. यावेळी त्यांनी आशिष शेलार आणि दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला. तसंच शिवसैनिकांना लढण्यासाठी प्रोत्साहित केलं. वाचा...
योगेश बोरसे- प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या अधिवेशनाला संबोधित केलं. यावेळी भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांच्यावर त्यांनी टीकास्त्र डागलं आहे. आशिष शेलार यांचा ‘आशिष कुरेशी’ असा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी शेलारांना डिवचलं आहे. यांचे मोठे नेते आरोप करतात. ७० हजार कोटींचा उल्लेख करतात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांच्यात येतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही म्हणतात आणि भर दुपारी २ वेळा लव्ह मॅरेज करतात, असंही सुषमा अंधारे नाशकात बोलताना म्हणाल्या.
दादा भुसेंना टोला
आपलं हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे अनेक गोष्टीसाठी हे प्रसिद्ध आहे. एमडी ड्रॅग्ज आणि ललित पाटीलसाठी हे नाशिक प्रसिद्ध आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाषणाला सुरुवात केली. पांढरी दाढी म्हणत अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला. नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे कारण पुन्हा शिवसेना सत्तेत येण्याची नांदी आहे. या महाराष्ट्रात 50 टक्के लोकसंख्या महिलांची आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
देशात महिला असुरक्षित- अंधारे
नरेंद्र मोदींच्या काळात रात्री १२ नाही तर दिवसा सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. महिलांचा अपमान केला जातो. राष्ट्रपतींना बोलवले जात नाही. महिलाना न्याय देत नाही. तरी महिला आरक्षणाचे बीलाचं आम्हाला गाजर दाखवतात. जर ६५ कोटीला ५४३ तर १४३ कोटीला १ हजारपेक्षा जास्त खासदार असले पाहिजेत. जातनीहाय जनगणना झाल्याशिवाय महिलाना आरक्षण मिळणार नाही. अर्धवट भक्त आम्हाला सांगतात आरक्षण आरक्षण जे आम्हाला मिळणार नाही आहे, असंही अंधारे नाशिकमध्ये म्हणाल्या.
नार्वेकरांवर निशाणा
राहुल नार्वेकरसारखे पाताळयंत्री लोक जेव्हा फासे टाकतात. किरीट सोमय्यांसारखे व्हीडीओ स्पेशलिस्ट ज्यांच्यावर आरोप केले. ते सगळे त्यांच्याबरोबर आहेत. ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते असे लोक आणि सत्ता असताना आरोप होते असे लोक आहेत. ज्याच्यावर आरोप नाहीत. त्यांची चौकशी करतात. त्यांच्यावर कारवाई करतात. जर आमच्यासोबत आला असता तर कारवाई झाली नसती, असं म्हणत अंधारेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.