रुपाली चाकणकर पक्षातील काम करणाऱ्या महिलांना..; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, नेमके आरोप काय?
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत नाशिकच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे.

ध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे अनेक काळे कारनामे सातत्याने समोर येत आहेत. आता याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सध्या अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला आहे. स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नाशिक जिल्हा महिलाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चाकणकर यांच्या निष्काळजीपणामुळेच गुन्हे घडले असून यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, असा दावा बलकवडे यांनी केला आहे.
अशोक खरात याने स्वतःला आध्यात्मिक गुरू असल्याचे सांगत अनेक महिलांची फसवणूक केल्याचे आणि त्यांच्यावर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचेही बोलले जात आहे. नुकतंच नाशिक जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रकरणी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले.
ग्रामीण भागात लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण
हे सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होते. रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असतानाही त्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यांनी वेळीच कठोर कारवाई केली नाही. नाशिक जिल्ह्याचे नाव एका विकृती खरात प्रकरणामुळे राज्यभर बदनाम होत आहे. चाकणकर यांच्या हलगर्जीपणामुळे हे गुन्हे घडले असून, आता आम्हाला ग्रामीण भागात लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे, असे प्रेरणा बलकवडे यांनी म्हटले.
खंबीर नेतृत्वाची गरज, गटबाजी करणाऱ्यांची नाही
हगवणे प्रकरण आणि संपदा मुंडे प्रकरणानंतर आता खरात प्रकरणामुळे पक्षाला प्रचंड ट्रोल केले जात आहे. रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडिया पोस्टवर येणाऱ्या विचित्र कमेंट्समुळे महिला कार्यकर्त्यांना पक्षात काम करणे अशक्य झाले आहे. राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत चाकणकर यांनी दोन गट पाडले आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांना त्या पदावरून काढून टाकत होत्या. संघटनेत खंबीर उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. गटबाजी करणाऱ्यांची नाही, असा गंभीर आरोप प्रेरणा बलकवडे यांनी केला.
आम्ही सुनेत्रा वहिनी पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पत्र लिहून ही परिस्थिती कळवली आहे. पक्षाला आता क्लीन इमेज असलेल्या प्रदेशाध्यक्षाची गरज आहे. जोपर्यंत रूपाली चाकणकर प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत नाशिक जिल्हा महिला संघटना त्यांचे स्वागत करणार नाही. त्या नाशिकला आल्यावर आम्ही त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकणार आहोत. त्या नाशिकमध्ये फिरू शकणार नाहीत,” असा इशाराही प्रेरणा बलकवडे यांनी दिला आहे.
नवीन महिला जोडणे कठीण
आम्ही दादांच्या कानावर टाकले तेव्हा त्यांनी सांगितले आपण बदल करु, असे सांगितले होते. अजित दादांना नंतर वेळ मिळाला नाही. आता दादा नाहीत. त्यामुळे आता सुनेत्रा वहिनींकडून अपेक्षा आहेत. त्यांनीच यात मध्यस्थी करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रेरणा बलकवडे यांनी व्यक्त केली. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेवर चालणारे लोक आहोत, पण सध्या जे समोर येत आहे ते वेदनादायी आहे. आमच्याकडे पाहून महिला पक्षात सहभागी होतात, पण अशा प्रकरणांमुळे नवीन महिला जोडणे कठीण झाले आहे, असेही बलकवडे यांनी नमूद केले.
रुपाली चाकणकर जेव्हा नाशिकला यायच्या, पण आमच्याकडे त्यांच्या तिकडच्या दौऱ्याची माहिती नसायची. रुपाली चाकणकर यांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर महिला काम करायला तयार नाही. चाकणकर यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक गुन्हे घडले आहेत. ग्रामीण भागात वारंवार त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. चाकणकर यांच्याकडून निष्काळजीपणा केला जात होता, असा गंभीर आरोपही बलकवडे यांनी केला.
