अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरावर कुणाची कृपा? किती निधी मंजूर? मोठी माहिती उघड
नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी २०१८ मध्ये महायुती सरकारकडून दीड कोटींचा निधी मंजूर झाल्याचा जीआर समोर आला असून, यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे सहकार्य असल्याचे उघड झाले आहे.

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची बाब आता उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा निधी मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी २०१८ मधील एक शासन निर्णय (GR) आता चर्चेचा विषय ठरला आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर भोंदूगिरीचे आरोप झाल्यानंतर आता त्याच्या ईशान्येश्वर मंदिराबद्दलची एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नुकतंच ईशान्येश्वर मंदिराच्या बांधकाम कोणी केले, याबद्दलची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासादरम्यान ३१ मार्च २०१८ रोजीचा एक सरकारी जीआर समोर आला आहे. यावेळी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या जीआरनुसार, मंदिराच्या परिसरातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
निधीतून कोणती कामे झाली?
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) या निधीतून मंदिराच्या परिसराचा कायापालट करण्यासाठी खालील कामे करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. यात भाविकांच्या निवासासाठी भव्य भक्तनिवासाचे बांधकाम करण्यात येणार होते. त्यासोबतच ईशान्येश्वर मंदिराचे सुशोभीकरण केले जाणार होते. तसेच संपूर्ण रस्ता आणि परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि चेंजिंग रूमची व्यवस्था केली जाणार होती. त्यासोबतच ईशान्येश्वर मंदिरात भव्य सभामंडपाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग ही कामेही यातून करण्यात येत होती.
सर्वपक्षीय नेत्यांचा वरदहस्त
याप्रकरणाच्या तपासात असे दिसून आले आहे की, खरातला केवळ एकाच पक्षाकडून नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांकडून मदत मिळत होती. ईशान्येश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुनियोजित असावा, यासाठी खरातने राजकीय वजन वापरून हा निधी पदरात पाडून घेतला होता. सरकारी कागदपत्रांमध्ये प्रत्येक कामासाठी किती निधी खर्च करण्यात यावा, याचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
आता हा जुना जीआर समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच एका भोंदूबाबाच्या कथित धार्मिक स्थळासाठी सरकारी पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर कसा खर्च झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
