NEET : लातूरमधील आणखी एका डॉक्टरची CBI कडून चौकशी, मोठी माहिती मिळण्याची शक्यता
Neet Scam : नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. आता आज लातूरमधील आणखी एका डॉक्टरची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत. शिवराज मोटेगावकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता या प्रकरणात सीबीआयकडून लातूरमधील आणखी एका डॉक्टरची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून मोठे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या चौकशीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लातूरमधील आणखी एका डॉक्टरची चौकशी
नीट प्रकरणी लातूरमध्ये पाचव्या डॉक्टरची चौकशी सुरू आहे. लातूर शहरातल्या औसा रस्त्यावर या डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे. अनेक दिवसांपासून या डॉक्टरची चौकशी करण्यात येणार अशी चर्चा होती, ती आज करण्यात येत आहे. आज सीबीआयने मोटेगावकरच्या क्लासेस कार्यालयात आणि एका वस्तीगृह आणि एका हॉस्पिटल मध्ये चौकशी केली आहे. आता या चौकशीतून महत्त्वाची माहिती सीबीआयच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार अमित देशमुख यांचे यावर नीट प्रकरणावर भाष्य
नीट प्रकरणावर बोलताना अमित देशमुख यांनी म्हटले की, देशभरात होणाऱ्या विविध परीक्षांच्या पारदर्शकतेबद्दल चर्चा सुरू असतानाच ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही परीक्षा संबंधित यंत्रणेने रद्दही केली आहे. लवकरच नीट ची पुनर्परीक्षा होणार आहे. या पेपरफुटीचा तपास सीबीआय आणि इतर तत्सम यंत्रणांमार्फत सध्या सुरू आहे. राज्यात आणि देशभरात या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत, ही अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि तेवढीच धक्कादायक बाब आहे. एकूणच हे पेपरफुटीचे प्रकरण, गुणवंत आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खिलवाड करणारे असल्यामुळे ते निषेधार्हच आहे.
या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सरकार सध्या ज्या गतीने कारवाई करते आहे त्याचे मी स्वागत करतो आहे. या तपासात अटक झालेल्या मंडळींकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातून आणखीनही चौकशी आणि तपास सुरूच आहे. तपास यंत्रणेने सखोल चौकशी करून या प्रकरणाची पाळीमुळे उखडून काढावीत अशीच माझ्यासह प्रत्येकाची अपेक्षा आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेलेले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईल, मा. न्यायालय पुराव्याच्या आधारे कोण दोषी आहेत ते ठरवेल, दोषी ठरणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा नक्कीच होईल, ज्यामुळे पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही ही अपेक्षा आहे.
तपास यंत्रणा योग्य पद्धतीने त्यांचे काम करीत असताना आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झालेले असताना आपण काही टिप्पणी करणे योग्य राहील का…..? असा प्रश्न माझ्यासमोर होता, मात्र दरम्यानच्या काळात काही उलट सुलट चर्चा झाल्या, काही मंडळींनी अनावश्यक वक्तव्य केली, त्यानंतर या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर बोलण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने मी इथे माझे मत मांडत आहे.
मागच्या काही वर्षात एकूणच देशभरातील शैक्षणिक, नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता हरवून गेलेली आहे. अनेक परीक्षेतील पेपरफुटीमुळे त्या परीक्षांचा बोजवारा उडालेला आहे. परिणामी अशा परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थांमधील ढिसाळपणाबद्दल समाजातून दबक्या आवाजात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. सामाजिक प्रश्नांची बांधिलकी जपणाऱ्या काँग्रेस पक्षानेच देशभरातील पेपरफुटीचा मुददा उचलून धरून सरकारला या संदर्भात जाब विचारला आहे.
