संतोष परब हल्ला प्रकरणाचं गोवा कनेक्शन काय? नितेश राणेंना गोव्यात नेऊन हॉटेलसह इतर ठिकाणांवर तपास
नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. आणि काही वेळात राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्यात नेत पोलिसांनी गोव्यातल्या हॉटेलचाही तपास केला. त्यामुळे संतोष परब हल्ला प्रकरणाचं कनेक्शन गोव्यात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला (Satosh Parab Attack Case) प्रकरणात कालच नितेश राणे पोलिसांना (Nitesh Rane Arrest) शरण आले आहेत. कोर्टाने राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Nitesh Rane in custody) दिली आहे. त्यामुळे पोलिसांना वेळ कमी असल्याने तपासाचा वेग जास्त वाढवला आहे. सकाळपासून नितेश राणेंची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सकाळीच पोलिसांनी राकेश परब आणि नितेश राणेंची समोरासमोर चौकशी केली. त्यानंतर नितेश राणेंना वेगवेगळ्या ठिकाणी नेत पोलिसांनी त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली. आणि काही वेळात राणेंना मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्यात नेत पोलिसांनी गोव्यातल्या हॉटेलचाही तपास केला. त्यामुळे संतोष परब हल्ला प्रकरणाचं कनेक्शन गोव्यात आहे का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. नितेश राणेंना कोठडी मिळाल्यापासून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे.
गोव्यात पोलिसांच्या हाती काय लागणार?
सर्वात आधी कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना समन्स बजावला होता. तसेच त्यांच्या अटकेसाठी गोवा, मुंबई आणि सिंधुदुर्गात शोध सुरू होता. पण नितेश राणे कुठे होते? हे कोणालाच माहिती नव्हते. अगदी नारायण राणेही यावरूनच वादात आले होते, राणेंनी याबाबत वक्तव्य केल्याने राणेंनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नितेश राणे सर्वासमोर आले नव्हते. ते गोव्यात लपून बसल्याचा संशय होता. तपासादरम्यान नितेश राणे कुठे होते? गोव्यात होते का? गोव्यात असतील तर तिथे काय करत होते? या सर्वांची उकल पोलिसांकडून सुरू आहे.
नितेश राणेंना पोलिसांनी मोठ्या फौजफाट्याच्या बंदोबस्तात बाहेर काढले होते. नितेश राणे यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. सकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यातही आणण्यात आले होते. पोलिसांनी कोर्टाला दहा दिवस कस्टडी देण्याची विनंती केली होती, मात्र कोर्टाने पोलिसांना दोनच दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर पोलिसांकडे कमी वेळ असल्याने पोलिसांनी तातडीने सुत्रं हलवण्यास सुरूवात केली आहे. या पोलीस तपासात आणखी काय माहिती हाती लागते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.