India vs Namibia : दिल्लीतील खेळपट्टी कोणाला मदत करणार? फलंदाज की गोलंदाज! जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताचा दुसरा सामना दुबळ्या नामिबियाशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. असं असलं तरी कोणत्याही संघाला कमी समजून चालणार नाही. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. चला जाणून घेऊयात खेळपट्टीचा अंदाज..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील 18वा सामना भारत आणि नामिबिया या संघात होणार आहे. भारताचा हा दुसरा आणि नामिबियाचा पहिलाच सामना आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं असलं तरी टीम इंडियाची बाजू नामिबियाच्या तुलनेत भक्कम आहे. त्यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. असं असलं तरी नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण हा सामना संध्याकाळी 7 वाजता आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी घेणं दोन्ही संघ पसंत करतील. त्यात ही खेळपट्टी कोणाला मदत करेल? असाही प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर
खेळपट्टी कोणाला मदत करणार?
अरूण जेटली स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांना पुरक आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर आरामात धावसंख्येचा पाठलाग करता येईल. कारण चेंडूला उसळी मिळते आणि आरामात बॅटवर येतो. त्यामुळे फलंदाजांना फटकेबाजी करण्यासाठी सोपं जाईल. फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत वेगवान गोलंदाजांना थोडी फार मदत होऊ शकते. पण फलंदाजांना अधिक फायदेशीर असणार आहे. एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी तापमान 22 ते 16 अंश सेल्सिअस असू शकते. दव पडणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं थोडं कठीण जाईल.
भारत नामिबिया सामन्यात कोण वरचढ?
भारत आणि नामिबिया यांच्यात द्विपक्षीय मालिका वगैरे होत नाहीत. त्यामुळे आयसीसी स्पर्धेतच भिडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. हा सामना भारताने जिंकला आहे. टी20 वर्ल्डकप 2020 मध्ये हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमवून 132 धावा केल्या होत्या. तर भारताने हे आव्हान 15.2 षटकात पूर्ण केलं होतं. आता जवळपास पाच वर्षांनी हे दोन संघ भिडणार आहे. असं असलं तरी भारत हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती आहे.
