मोठी बातमी! शिंदे की ठाकरे… ओमराजेंचं ठरलं…? बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा खुलासा
Omraje Politics : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. मात्र ते अंतिम निर्णय कार्यकर्तांशी चर्चा करून घेणार आहेत. याबाबतच्या बैठकीतून मोठी माहिती समोर आली आहे.

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. त्यांनी ठाकरे गटाकडून बजावण्यात आलेल्या व्हीपला प्रतिसाद न देता बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. सध्या ते कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आहेत. आता बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे.
ओमराजे शिवसेनेच्या वाटेवर?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सध्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. मात्र आता ओमराजे निंबाळकर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. निंबाळकर यांच्याबरोबर बैठकीमध्ये चर्चा करून बाहेर आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. भूम परांडा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची सुरुवातीला बैठक झाली. या बैठकीबाबत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जनतेच्या विकासासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्तेमध्ये जावे आणि तीच मागणी आम्ही बैठकीमध्ये केली. आमच्या मागणीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिसाद दिला असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ओमराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ओमराजे ठाकरेंच्याही संपर्कात
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि खासदार अरविंद सावंत यांचे निकटवर्तीय नेते वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. या बैठकीत सध्याच्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या बंडखोरीचा मुद्दा आणि ओमराजे यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर ओमराजेंनी आपण मतदारसंघात जाऊन निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती.
ओमराजेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या पुढील निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण ओमराजेंनी जर ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला तर बंडखोरी केलेले इतर खासदार अडचणीत सापडू शकतात. 2 तृतीयांश आकडा न जमल्यामुळे उर्वरित खासदारांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओमराजेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
