Rohit Pawar: कर्जमाफीवर भरवसा नाय… रोहित पवार पुन्हा मैदानात… या दिवसापासून राज्यात एल्गार मोर्चा
Rohit Pawar on Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कर्जमाफीची अंमलबजावणीची प्रक्रिया वेगात असतानाच आमदार रोहित पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. अन्नत्याग आंदोलनानंतर आता त्यांनी एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे.

गजानन देशमुख, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : रोहित पवार यांनी सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. सरकारने या आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू झाली आहे. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली आहे. पण आमदार रोहित पवार यांनी सरकारवर भरवसा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी पुन्हा मैदानात (Rohit Pawar Elgar Morcha for Farmer Loan Waiver) उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
70 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय
सरकारने जी कर्जमाफी दिली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अटी घातल्या आहेत, त्यामुळे 70 टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. पंढरपुरच्या पवित्र भूमीत शब्द देऊन सरकार खोटे बोलत असेल तर आपण काय करणार, त्यामुळे 30 तारखेला आम्ही एल्गार मोर्चा काढतोय, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. मला विश्वास आहे या एल्गार मोर्चा पूर्वी सरकारला आमचं ऐकावंच लागेल, असा दावाही पवार यांनी केला. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2029 मध्ये दादांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना बाजूला
देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे असा राज्यात गट तयार झालाय. एकनाथ शिंदे यांना अडचण यावी असा प्रयत्न भाजपकडून सातत्याने केला जातोय. पण डीलिमिटेशन कायदा करण्यासाठी हे 6 खासदार फोडण्यासाठी केंद्राकडून एकनाथ शिंदे यांना मदत झाली असावी त्यामुळे राज्यातून खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांना कोणी मदत केली असेल असं मला तरी वाटत नाही. डीलिमिटेशन मतदान होईपर्यंत त्यांची किंमत होणार आहे. 2029 ला अमित शहा बोलल्याप्रमाणे भाजपा लोकसभा एकटा लढणार आहे. त्यावेळी युतीमधून एकनाथ शिंदे बाजूला असतील आणि अजित दादांचा पक्षही बाजूला असेल, असा मोठा दावाही आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
सुनेत्रा पवार यांचं पक्षात फारसं चालत नाही
अजित दादांच्या मृत्यूचा तपास हा पारदर्शक पद्धतीने व्हावा यासाठी कुठेही भाजप प्रयत्न करताना दिसत नाही. शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षाकडून सुद्धा याचा फॉलोअप होत नाही हे दुर्दैव आहे. दादांना ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांना संधी मिळत असेल तर याचा अर्थ असा आहे की अजित दादांच्या कुटुंबातील ज्या प्रमुख नेत्या आहेत त्यांचं पक्षात फारसं काही चालत नाही असं दुर्दैवान म्हणावं लागतं आहे. असं राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार नांदेडमध्ये म्हणाले.