Sharad Pawar : हेच असतं राजकारण, कालपर्यंत जे तटकरे-पटेल पवारांना खुपत होते, त्यांच्याबद्दल आता तेच शरद पवार म्हणतात की..
Sharad Pawar : शरद पवार यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल कुठलाही राजकीय पंडित ठामपणे अंदाज वर्तवू शकत नाही. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद, कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यावर शरद पवार यांनी घेतलेली भूमिका अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.

राजकारणात कधीच कोण कोणाचा मित्र नसतो, कोणी शत्रू नसतो असं म्हणतात ते उगाच नाही. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. आजचे मित्र उद्याचे विरोधक आणि कालचे विरोधक आजचे मित्र. महाराष्ट्रातील मागच्या तीन-चार वर्षातील राजकारण पाहिल्यानंतर जनतेला याची चांगलीच सवय झाली आहे. आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे. त्यावर शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं. त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले, तेव्हापासून शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांकडून अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांवर टीका सुरु होती. अगदी अलीकडे काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना टार्गेट करण्यात येत होतं.
पण आता शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबद्दल व्यक्त केलेलं मत अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. नुकतचं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नाहीय. प्रफुल पटेल यांनाही डावललं जात असल्याची चर्चा आहे. नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरु झाले. त्यावर सुनील तटकरे यांनी ही भेट राजकीय कारणांसाठी नव्हती, तर शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी होती असं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.
शरद पवार यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता
त्यानंतर आता शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा क्षमता असणारे नेते म्हणून कौतुक केलं. त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करावा, हा त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले. थेट शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं कौतुक केल्याने आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. कारण स्वत: शरद पवार आणि त्यांच्या पक्षाकडून या दोघांवर टीका सुरु होती. पक्ष फुटीसाठी त्यांना जबाबदार धरलं जात होतं, आणि आता अचानक त्यांचं कौतुक. त्यामुळे विविध तर्क-वितर्क सुरु होणं स्वाभाविक आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील दुहीचा शरद पवार आपल्या राजकीय फायद्यासाठी तर वापर करत नाहीयत ना? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद पवार यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता. त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल कुठलाही राजकीय पंडित ठामपणे अंदाज वर्तवू शकत नाही.
