Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा कहर; राज्याच्या या भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा, मोठं नुकसान
Maharashtra Rain News : आज राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. हिंगोली, वर्धा, वाशिमच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. कोकणातही अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. उर्वरित राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. हिंगोली, वर्धा, वाशिमच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हिंगोलीत शेतमालाचे मोठे नुकसान
आज हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. कळमनुरी तालुक्यातील वडगाव, जवळा पांचाळ शिवारात मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील कुंडकर पिंपरी गावात विजेचे रोहित्र आणि खांब कोसळले, यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
कळमनुरीत मुसळधार पाऊस
हिंगोलीतील कळमनुरीतही आज मुसळधार पाऊस पडला. पहिल्याच पावसात कळमनुरी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार समोर आला. पहिल्याच पावसात विविध भागातील नाले ओरफ्लो झाले. यामुळे मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत होते. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई न केल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे कळमनुरी नगरपरिषदेवर प्रश्नचिंन्ह उपस्थित होत आहेत.
वर्ध्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
वर्धा शहरासह विविध भागात आज जोरदार पावसाची हजेरी पहायला मिळाली. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने मागील दोन दिवसांपासूनच्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता आगामी काळात या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा वेग मंदावणार
मान्सून राज्यात दाखल झाला असला तरी अद्याप पावसाला सुरूवात झालेली नाही, याचे कारण म्हणजे एल निनो सक्रिय झाला असल्याने मान्सूनला ब्रेक लागला आहे. आता पुढचे काही दिवस पावसाची ओढ कायम राहणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पावसाची शक्यता कमीच आहे. अरबी समुद्रातील नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा वेगही कमी झाला आहे. अद्यापही कोकणातल्या अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे, त्यामुळे बळीराजाने पेरणीची घाई टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे. जून महिन्यातल्या 12 दिवसात केवळ 2.37 टक्केच पाऊस झाल्याचेही समोर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
