पुण्यात दूध भेसळीचा पर्दाफाश, 10 जण अटकेत, कोणत्या राजकीय नेत्याचे कनेक्शन?
पाण्यामध्ये शाम्पू आणि वेगवगेळे केमिकल्स मिसळून ही टोळी बनावट दूध तयार करत होती. हे नकली दूध राज्यातील वेगवगेळ्या दूध संकलन केंद्रांवर पोहचत होतं आणि तिथून ते नामांकित डेअरींना पाठवलं जात होतं .

Pune Milk Scam : राज्यात दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात आणखी दहा जणांना मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळं आता अटकेचा आकडा चोवीस वर पोहचलाय. 4 जुलै रोजी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापा टाकून या टोळीचा पर्दाफाश करण्यात एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं होतं. दरम्यान, आता याच दूध भेसळ प्रकरणात एका पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा होत आहे.
वेगवगेळे केमिकल्स मिसळून ही टोळी…
पुणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असलेल्या विष्णू हिंगे यांचा सख्खा पुतण्या राज्यातील दूध भेसळीच्या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचा दावा केला जातोय. पाण्यामध्ये शाम्पू आणि वेगवगेळे केमिकल्स मिसळून ही टोळी बनावट दूध तयार करत होती. हे नकली दूध राज्यातील वेगवगेळ्या दूध संकलन केंद्रांवर पोहचत होतं आणि तिथून ते नामांकित डेअरींना पाठवलं जात होतं . ब्रँडेड दुधाच्या पाकिटांमध्ये हे नकली दूध विकलं जात होतं, असं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुशांत हिंगे याच्यासह चौदा जणांना आधी अटक केली होती .
टोळीचा मास्टरमाइंड सुशांत हिंगे
सुशांतच्या चौकशीतून त्यानं नकली दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी केमिकल्स आणि शाम्पू दूध संकलन करणाऱ्या आणखी दहावा जणांना विकल्याचं समोर आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या दहा जणांमध्ये सातजण पुणे जिल्ह्यातील आहेत, दोघे नगर जिल्ह्यातील आहेत तर एकजण जालना जिल्ह्यातील आहे. या टोळीचा मास्टरमाइंड सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून मंचर मधून निवडून आलेल्या विष्णू हिंगे यांचा पुतण्या आहे. विशेष म्हणजे विष्णू हिंगे हे स्वतः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळावर आहेत.
भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे
या दूध भेसळ प्रकरणावर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. दुग्ध व्यवसाय हा शेतीपुरक व्यवसाय आहे. दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी हिम्मत परत कोणीही करणार नाही, अशी शिक्षा द्यायला हवी. सरकार यात लक्ष घालणार आह, असं भरणे म्हणाले.
