नातीचा हट्ट पुरवायला गेले, पण नियतीने अर्ध्यावर डाव साधला अन्… आजोबासह नातीवर काळाचा घाला
पुणे जिल्ह्यातील भोर येथे डंपरच्या धडकेत आजोबा व ९ वर्षीय नातीचा मृत्यू झाला, तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून अंत झाला. या दोन दुर्दैवी घटनांमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक या जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात झालेल्या रस्ते अपघातात आजोबा आणि त्यांच्या ९ वर्षीय नातीचा अंत झाला. तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये एका १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. यामुळे रस्ते सुरक्षा आणि जलसाठ्यांजवळील खबरदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
पुण्याच्या भोर तालुक्यातील हातवे-तांभाड रस्त्यावर शनिवारी सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. यात शिवाजी नामदेव शिळीमकर (६९) आणि तन्वी नितीन शिळीमकर (९) या आजोबा आणि नातीचा दोघांचा मृत्यू झाला. शिवाजी हे आपली नात तन्वी नितीन शिळीमकर (९) हिला दुचाकीवर घेऊन आपल्या मूळ गावाकडे तांभाडकडे जात होते.
यावेळी देऊळवाडी (हातवे) गावच्या हद्दीत आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे तांभाड गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजगड पोलिसांनी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नाशकात तरुणाचा बुडून मृत्यू
तर दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एका १६ वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक परदेशी असे या मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी कार्तिक आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी इगतपुरी नगरपरिषदेच्या तलावावर गेला होता. पाणी पाहून कार्तिकला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने तलावात उडी मारली, परंतु पाण्याचा आणि तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. सलग दोन दिवस शोध घेतल्यानंतर, शनिवारी रात्री गोताखोरांच्या मदतीने कार्तिकचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, इगतपुरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
