गोंधळ घालणारे भाजपचे भाडोत्री, नाशापाणी करून आले, कर्फ्यू लावण्याचा प्रयत्न; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पुण्यात छात्र कार्यक्रमातील गोंधळामागे भाजपचे भाडोत्री, नशापाणी केलेले कार्यकर्ते असल्याचा आरोप केला. दंगलसदृश परिस्थिती निर्माण करून कर्फ्यू लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे ते म्हणाले. पोलिसांनी रात्रीच्या घटनेचे गुन्हे सकाळी विचारपूर्वक दाखल केले असून, ही पक्षपाती कारवाई असल्याचा दावा करत सकपाळ यांनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

पुण्यात होणाऱ्या छात्रो की गुंज या आमच्या कार्यक्रमाला तरुण येऊ म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल धुमाकूळ घालणारे लोक अभाविपचे कार्यकर्ते नव्हते. ते सर्व भाजपचे कार्यकर्ते होते. भाडोत्री लोक होते. नशापाणी करून आले होते. त्यांनी तिथे दंगल सदृश्य परिस्थिती करून कर्फ्यू लावायचा होता, असा आरोप करतानाच पोलिसांनी रात्रीच्या राड्याबाबतचे गुन्हे आज सकाळी दाखल केले. याचाच अर्थ ते विचार करून दाखल करण्यात आले आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. जे लोक काल घटनास्थळी नव्हते, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल मध्यरात्री मी पोलिसांकडून जी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यानुसार ते वागले नाही. काल गोंधळ घालणारे अभाविपचे लोकं नव्हते. ते भाजपचे कार्यकर्ते होते. ते भाडोत्री होते. त्यांचा आवेश, त्यांची वागण्याची पद्धत ही वेगळी होती. नशापाणी करून येऊन गोंधळ घातला गेला. पोलिसांनी राजकीय कारवाई केली. वस्तुनिष्ठ कारवाई झाली नाही, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
आम्ही पाठपुरावा करणार
मी कोणताही आरोप करत नाही. घटनास्थळी पत्रकार होते. पोलीस होते. सर्वकाही रेकॉर्ड आहे. कोणतीही चुकीची घटना घडू नये असा आमचा प्रयत्न होता. तर दुसऱ्या गटाचा प्रयत्न दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा होता. कर्फ्यू लागावा असा त्यांचा प्रयत्न होता. आज सकाळी सकाळी गुन्हे दाखल केले. म्हणजे विचार करून गुन्हे दाखल केले. रात्री 10 च्या घटनेचे सकाळी गुन्हे दाखल होतात, यावरून काय सुरू आहे हे लक्षात येतं, असं सांगतानाच आम्ही आमचं लक्ष विचलित करणार नाही. कालच्या घटनेचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
चोर सोडून संन्याशाला फाशी
आमचा मॉब हा संख्येने जास्त होता. भाजपचा कमी होता. आमच्या कार्यकर्त्यांनी संयमाने घेतले. त्यांनी हिंसाचार केला नाही. आमच्या लोकांनी शांततेची भूमिका घेतली. आक्रमक कोण होतं? शिवीगाळ कोण करत होतं? भाजपच्या लोकांनी कायदा हातात घेतला. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम पोलिसांनी केलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ती तिची भूमिका
याप्रकरणावर एका विद्यार्थीनीने व्हिडीओ शेअर करून तिचे मत मांडलं होतं. त्यावरही सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती विद्यार्थीनी आहे. तिला या प्रकरणात ओढण्याचं मी समर्थन करत नाही. तिची ती भूमिका आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तिला बोलायलं सांगितलं असं नाही. तिची ती भूमिका आहे. जे चुकीचं वागले, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दोन्ही गटावर गुन्हे दाखल व्हायला हवे होते. आमचं लक्ष्य लोकांचे प्रश्न ऐरणीवर आणणं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
विद्यार्थीनींनी भ्रम फोल ठरवला
भरभरून लोक आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भीतीचं वातावरण तयार करण्याचं काम केलं. विद्यार्थ्यांनी आमच्या आजच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. कार्यक्रमात बाधा आणण्याचा डाव होता. भीतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होता. पण विद्यार्थ्यांनीच उपस्थित राहून त्यांचा भ्रम तोडला. मुलींनी पुढे येऊन त्यांचा हेतू फोल ठरवला, असंही ते म्हणाले.