Narsapur case: तुला काय शिक्षा देऊ तूच सांग? कोर्ट संतापलं; नरसापूर प्रकरणात थेट आरोपीलाच विचारणा
Narsapur case Accused Bhimrao Kamble: भोर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे यांना दोषी ठरवले आहे. कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपीचे कृत्य ऐकून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या घटनने राज्यात खळबळ माजली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळेला कोर्टात हजर करण्यात आले होते. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेने जे काही केले ते ऐकून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आरोपीलाच थेट “तो प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा देऊ ते सांग. फाशी की जन्मठेप?” असा प्रश्न विचारला आहे.
वकीलांचा युक्तीवाद
सरकारी वकिल अजय मिसार यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, सुट्टी असल्याने पीडित मुलगी आजीकडे राहायला गेली होती. २५ तारखेपासून आरोपी तिची रेकी करत होता. त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे मेडिकल रिपोर्टमध्येही स्पष्ट झाले आहे. “अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत वकिलाने सांगितले की, पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. वकिलाने पुढे म्हटले, “वासनेसाठी आरोपीने हे कृत्य केले. १ मे रोजी तू काय केलंस, ते तुझ्या अंतःकरणाला विचार.”
कोर्ट भीमराव कांबळेवर संतापले
कोर्टानेही अत्यंत संतप्त भावनेने आरोपीला उद्देशून म्हटले, “१ मे रोजी तू काय केलंस, ते तुझ्या अंतःकरणाला विचार. तो प्रसंग आठव आणि सांग, तुला कोणती शिक्षा योग्य वाटते. फाशी की जन्मठेप?” सरकारी वकिलाने युक्तिवादात स्पष्ट केले की, आरोपीला मृत्यूदंड दिला नाही तर तो जेलमध्ये काय करेल याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे अशा क्रूर कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर भिमराव कांबळेने त्या निष्पाप जीवासोबत 39 मिनिटे अतिशय घृणास्पद कृत्य केल्याचे वकीलांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीत कांबळेने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याचे म्हणणे सरकारी वकिलांनी मांडले. तर सरकारी वकिलांनी आरोपी कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची विनंती केली आहे.
नेमकं काय घडलं?
1 मे रोजी नसरापूरमध्ये एका 65 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. ज्यावेळी हा नराधम चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करत होता, त्यावेळी तिथल्या 4 ते 5 लहान मुलांनी त्याला पाहिले होते. मात्र, या नराधमाने त्या निष्पाप मुलांना दगड फेकून मारत तिथून पळवून लावले आणि त्यानंतर घृणास्पद कृत्य सुरूच ठेवले. आता या प्रकरणी कोर्टाने आरोपीला दोषी मानले आहे.
