पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेने घेतला प्रवाशांसाठी हा निर्णय
Pune-Mumbai News : पुणे-मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगला निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशी आणि रेल्वे पासधारक यांच्यात होणार वाद टाळला जाणार आहे. तसेच प्रवाशांना आणखी एक सुविधा मिळणार आहे.

योगेस बोरसे, पुणे : नोकरी , व्यवसायाच्या निमित्तानं नियमितपणे पुणे- मुंबई असा प्रवास करणारे अनेक प्रवाशी आहेत. आता रेल्वेने या प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे-सोलापूर (Mumbai-Pune-Solapur Route) मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावत आहे. त्याचा फायदा अनेक प्रवाशी घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत आहे. परंतु वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे जास्त आहे. यामुळे पुणे-मुंबई नियमित प्रवास करणारे एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य देतात. त्यांच्यांसाठी एक्स्प्रेसला एक डबा वाढवण्यात आला आहे.
एक डबा वाढवणार
पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेसला आता आणखी एक डबा वाढवला जाणार आहे. सिंहगड एक्स्प्रेसने अनेक प्रवाशी प्रवास करतात. त्यांना आरक्षण मिळत नाही. तसेच या गाडीत पासधारक असतात. त्यांच्यांसाठी स्वतंत्र डबे असतात. या डब्यांमध्ये प्रवाशी गेल्यास वाद निर्माण होतात. आता हे वाद टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. या गाडीला एक जनरल डबा वाढवण्यात येणार आहे. 1 मे पासून सिंहगड एक्स्प्रेसला डबा जोडला जाणार आहे. त्याची 120 प्रवाशांची क्षमता असणार आहे. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेस16 डब्यांसह धावणार आहे. पासधारक आणि जनरल प्रवाशी यांच्यामध्ये वाद होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.
असा झाला होता वाद
सिंहगड एक्स्प्रेसमधून दररोज हजारो चाकरमानी पुणे- मुंबई प्रवास करतात. मागील काही दिवसांपासून नवीन आणि जुने पासधारक यांच्यातील वाद होत आहे. नुकतेच जून्या पास धारकांच्या सात जणांच्या टोळक्याने बसण्याच्या कारणावरून एका प्रवाशाला बेदम मारहाण केली होती. त्यापूर्वी पंधरा दिवसात सिंहगड एक्सप्रेसमध्ये ५ फ्री स्टाईल हाणामारीच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे.
अनेक दिवसांपासून होती मागणी
सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी संघटनांकडून सिंहगड एक्स्प्रेसचे कोच वाढवण्याची मागील काही दिवसांपासून केली जात होती. अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने सिंहगड एक्स्प्रेसला एक द्वितीय श्रेणी चेयर कार (नॉन-एसी) डब्बा वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे.
हे ही वाचा
कोकणातील रेल्वे प्रवास आता अधिक मस्त, विस्टाडोम कोचमुळे मिळेल निसर्गाचा आनंद
