ग्रामीण भागातील जनतेचं काय? सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय? विखे-पाटलांची प्रश्नांची सरबत्ती
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिर्डीमध्ये बोलताना सरकावर प्रश्नांची सरबत्ती केलीय.
शिर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन अटळ असल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्यात दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पावलं टाकली जात आहेत. अशावेळी राज्यात गोरगरीब जनतेसाठी, छोट्या व्यवसायिकांनी पॅकेज द्यावं, तर लॉकडाऊनबाबत सकारात्मक विचार करु, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतलीय. भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही शिर्डीमध्ये बोलताना सरकावर प्रश्नांची सरबत्ती केलीय. (what will do for farmers? Radhakrishna Vikhe Patil’s questions to government)
आपली जबाबदारी झटकण्यासाठी लॉकडाऊन लावला जातोय. कोरोनाच्या उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राज्यात प्रभावी उपाययोजना व्हायला हव्या. फक्त शहरांचा विचार करुन चालणार नाही. ग्रामीण भागातील जनतेचं काय? छोटे व्यवसायिक, शेतकऱ्यांसाठी सरकार काय करणार आहे? हातावर पोट असणाऱ्यांनी जगायचं कसं? त्यांना सरकार काही आर्थिक मदत करणार आहे का? असे प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारले आहेत.
‘लॉकडाऊन ऐवजी उपाययोजना करा’
त्याचबरोबर आज माणसांचं जीवन उद्ध्वस्त झालं आहे. फक्त केंद्रावर टीका करुन चालणार नाही. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा कोण करणार? ही राज्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे खासगी दवाखान्यात सर्रास लूट सुरु आहे. शासकीय दवाखान्यात सुविधांची वाणवा आहे. सरकार म्हणून कुठलंही काम जबाबदारीनं होत नाही. लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊन ऐवजी उपाययोजना करा, प्रत्येक घटकाला काय मदत करणार ते जाहीर करा, अशी मागणी विखे-पाटलांनी सरकारकडे केलीय.
हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल : बाळासाहेब थोरात
लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असंही थोरातांनी नमूद केलं. आपण गेल्यावेळी दररोज 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. बाहेरच्या राज्यातील मजुरांची व्यवस्था केली. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं काम झालं. केंद्राने काय पॅकज दिलं आम्हाला समजलं नाही, असा आरोप थोरातांनी भाजपवर केला. पहिली फेज आपण यशस्वी हाताळली तेव्हा महाराष्ट्रातील या सरकारचं अभिनंदन सगळ्यांनी केलं हे विसरू नये. आता दुसरी फेज आहे संसर्ग जास्त आहे, सतर्कपणे सरकार परिस्थिती हाताळत आहोत, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
संबंधित बातम्या :
आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल : बाळासाहेब थोरात
what will do for farmers? Radhakrishna Vikhe Patil’s questions to government