Rain Update: मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस, पुणे, नाशिक, जळगाव आणि साताऱ्यातील धरणांमधून पाणी विसर्ग
राज्यभरात पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे (Rain Updates of maharashtra).
मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर काहिसा कमी झाला आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे (Rain Updates of maharashtra). मुंबईतील उपनगरात कुर्ला, चेंबूर, सायन, माटूंगा परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे दमदार पावसानंतर राज्यभरातील पाणीसाठ्यांमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव आणि सातारामधील धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु आहे.
पुणे
खडकवासला धरणातून सकाळी 5 हजार 136 क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणात 72.30 टक्के पाणीसाठा आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सध्या पाऊसाचा जोर ओसरला आहे. काल (13 ऑगस्ट) रात्री मुठा नदीत 16 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या भिडे पुलाला लागून पाण्याचा प्रवाह सुरु आहे. खबरदारी म्हणून भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय भिडे पूलाला लागून असणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आली. मुठा नदी काठालगत असणाऱ्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा : पुणेकरांसाठी खुशखबर, धरणांमध्ये मुबलक पाणी, खडकवासला धरण 92.61 टक्के भरलं
नाशिक
नाशिकमधील दारणा धरणातून 9 हजार 900 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या 24 तासांपासून इगतपुरी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने दारणा धरणं 92 टक्के भरलं. यानंतर हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा बरोबर भावली धरणं देखील भरल्याने भावलीतून 700 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नाशिक शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. गंगापूर धरणातील पाणी साठ्यात 7 टक्क्याने वाढ झाली. गंगापूर धरण 66.92 टक्के भरलं. निफाडमधील नांदूरमधमेश्वर धरणाच्या 5 वक्राकार गेटमधून गेल्या 16 तासापासून 16 हजार 865 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरु आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात साडेसहा टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा : Nashik Rain | नाशिकच्या सटाण्यात तुफान पाऊस, ट्रॅक्टरचालकाचा व्हिडीओ व्हायरल
कोल्हापूर
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. धरणातील विसर्गही थांबला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 29 फूट 7 इंचावर आली आहे. पंचांगगेचं पाणी पुन्हा पात्रात आलं आहे.
जालना
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 64 पैकी 48 प्रकल्पांमध्ये 50.99 टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. विशेषतः मध्यम प्रकल्पात 63.64 टक्के पाणीसाठा झाल्याने शहरी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. 16 प्रकल्पांमध्ये अद्यापही मृत पाणीसाठा नाही. जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी भोकरदन तालुक्यातील जुई, धामना आणि जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत.
अंबड तालुक्यातील ग्लहाटी प्रकल्पात 84.39 टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 68.39 टक्के, जालना तालुक्यातील गिरजा प्रकल्पात 29.89 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील 57 मध्यम प्रकल्पामध्ये 52.59 दलघमी म्हणजे 43.78 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
हेही वाचा : पंचगंगेचं पाणी महामार्गापर्यंत पोहोचलं, तर सांगलीत कृष्णा नदीपात्रात 15 बोटी तैनात
जळगाव
भुसावळ हतनूर धरणाचे 24 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हतनूर धरणाचे दरवाजे उघडले. हातनूर धरणातून 75,125 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
सातारा
कोयना धरणात 82.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पण सलग पाऊस सुरु आहे. धरणात 20694 क्यूसेकने पाणी आवक सुरु आहे. पाणी नियमनासाठी आज सकाळी 11 वाजता पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली. दरवाजे उघडणार नाहीत. पायथा वीजगृहातून पाणी विसर्ग करणार आहेत.
हेही वाचा : पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होण्याची भीती
वसई-विरार
वसई विरारमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. कालपासून वसई-विरार नालासोपाऱ्यात अधूनमधून उघडझाप करत पाऊस पडत आहे. मागच्या 24 तासात वसई तालुक्यात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनपासून आजपर्यंत 1897 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे.
बारवी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बारवी धरणाची पाणी पातळी 67.76 मीटरवर गेली आहे. धरणात सध्या 63.28 टक्के पाणीसाठा झाला आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे ही वाढ झाली.
संबंधित व्हिडीओ :
Rain Updates of maharashtra