शरद पवारांना रामदास आठवलेंची सर्वात मोठी ऑफर, म्हणाले काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा…
महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पवारांना एनडीए किंवा आरपीआयमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक नवा आणि धक्कादायक प्रस्ताव समोर ठेवला आहे. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील व्हावे आणि जर त्यांना भाजपसोबत काही अडचण असेल, तर त्यांनी थेट माझ्या आरपीआय पक्षात प्रवेश करावा,” अशी खुली ऑफर रामदास आठवलेंनी दिली आहे.
रामदास आठवले यांनी शनिवारी मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामुळे राज्याच्या राजकारणात आता नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रामदास आठवले यांनी भूतकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा मी स्वतः शरद पवारांना काँग्रेससोबत युती करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेसची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार सोडून द्यावा. त्यांच्यासाठी एनडीए (NDA) हाच सध्याच्या घडीला सर्वात उत्तम पर्याय ठरू शकतो.”
विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण का आले?
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत अंतर्गत पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानाने या चर्चेला अजून उधाण आले. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात देशात आणि राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष उभा करणे गरजेचे आहे. यासाठी भूतकाळात ज्या नेत्यांनी किंवा पक्षांनी काँग्रेस सोडली होती, त्यांनी आता पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र यायला हवे, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या तर्कवितर्कांना वेग आला.
भाजपची अडचण असेल तर आरपीआयचा पर्याय!
संजय राऊत यांच्या विलीनीकरणाच्या आवाहनावर पलटवार करताना रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. जर शरद पवारांना भाजपच्या विचारसरणीशी किंवा त्यांच्यासोबत काम करण्यात काही समस्या असतील, तर त्यांनी एनडीएमधील आमचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयमध्ये सामील व्हावे, असा प्रस्ताव रामदास आठवले यांनी दिला. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पवार गटाची भूमिका गुलदस्त्यात
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जरी ही नवी राजकीय गुगली टाकली असली, तरी काँग्रेससोबतच्या विलीनीकरणाबाबत किंवा आठवलेंच्या ऑफरबाबत शरद पवार अथवा त्यांच्या पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार गट कोणती रणनीती आखतो आणि या चर्चांना पूर्णविराम देतो का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
