शरद पवारांचं ‘ते’ कृत्य गद्दारी नाही का?; भरसभेत शहाजी बापू पाटलांचा सवाल
Shahajibapu Patil on Sharad Pawar and Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. सांगोल्यातील जाहीर सभेत बोलताना शहाजीबापू पाटलांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
सांगोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडत आहे. माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषण केलं. विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली असल्याचा आरोप केला जातो. या आरोपाला यावेळी शहाजीबापू पाटलांनी उत्तर दिलं. माझा सख्खा भाऊ मेल्यावर पण लगेच 8 सभा केल्या. एवढं मी शरद पवारांच्यासोबत प्रामाणिक राहिलो. शरद पवार मला म्हणायचे शहाजी बापू यावेळी तुम्ही निवडून येतंय असे रिपोर्ट आलेत. असं पवार म्हणायचे आणि मागे वेगळे बोलायचे. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांना एका दणक्यात मुख्यमंत्रीपदावरून खाली काढले ही गद्दारी नाही का?, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
मोहिते पाटलांवर टीका
मोहिते पाटलांनी सांगोला तालुका उध्वस्त केला. सांगोला तालुका वाळवंट केला. उजनी, टेंभू, म्हैसाळ यातून सांगोला तालुक्याला पाणी दिले नाही. दोन वर्षात तालुक्यातील सर्व भागात पाणी दिले तर राजाराम पाटील हे माझ्या बापाचे नाव लावणार नाही. गुवाहाटीला कशाला गेलते असेल प्रश्न विचारतात पण लोकांना नाही कळू द्या पण मला तर कळाले. बायकोची शपथ घेऊन सांगतो की गणपतरावाना पाडण्यासाठी मी निवडणूक लढवत नव्हतो. तर माझ्या जनतेला पाणी मिळावे म्हणून निवडणूक लढवत होतो, असं शहाजी बापू पाटलांनी सांगितलं.
आमचं पाप धुतलं गेलं- शहाजी बापू पाटील
सांगोला तालुक्यातील निधी 5 हजार कोटीचा निधी दिला. पण हे कशामुळे मिळाले तर महायुती सरकारमुळे मिळाले. ज्या माणसामुळे आमदार झालो. ज्या पक्षाने ताकद दिली त्याच्या पाठीत खंजीर खुपसल्या सारखं वाटत होतं. मांजर मारल्यावर जसं काशीला जाऊन आले की पाप धुतले जातात. त्याप्रमाणे आम्ही गुवाहाटीला गेल्यामुळे आमचं पाप धुतलं गेलं, असं शहाजी बापू म्हणाले.
आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून रणजीतसिंह मोहिते पाटलांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. चूक लक्षात येताच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यायात आलं. सांगोल्याचे लीड दिसले तर पाणी दुसेल नाहीतर आम्ही बी लय शहाणे आहोत. पुन्हा चार वर्ष उजनीचे पाणी येतंय का ते बघा, असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं आहे.