मुख्यमंत्र्यांपासून अमित शाहांपर्यंत…. भोंदू बाबा अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे नेते कोण? संजय राऊतांनी थेट नावेच वाचली
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले असून, खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या मंत्र्यांची आणि आमदारांची यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे.

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याद्वारे त्यांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू बाबापेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक मोठे गुन्हेगार आहेत, अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणावरुन राज्य सरकारवर आणि सत्ताधारी नेत्यांवर घणाघाती आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला धारेवर धरले. खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या ४० आमदार, खासदार आणि मंत्र्यांची यादी सरकारने तातडीने जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार
सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं, तर हे जे ४० आमदार, खासदार किंवा मंत्री हे तिथे सेवा करायला जात होते. त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती. भोंदू बाबा पेक्षा त्याला प्रतिष्ठा देणारे राज्यकर्ते आणि राजकारणी अधिक गुन्हेगार असतात. भोंदू बाबा गुन्हेगार आहेच. पण त्या भोंदूबाबाच्या चरणाशी जाऊन त्याची सेवा करणारे, स्तुती करणारे त्या राज्यकर्त्यांना अधिक अपराधी मानायला हवं. त्यामुळे अशा सर्वांची यादी जाहीर व्हायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
जर सरकार या भोंदू बाबाच्या पाठीशी नसते, तर या नेत्यांची नावे आतापर्यंत समोर आली असती. गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना ज्याप्रमाणे सह-आरोपी केले जाते, त्याच धर्तीवर या नेत्यांचीही चौकशी व्हायला हवी. तुम्ही इतर गुन्ह्यांमध्ये सहआरोपींची नाव देता, गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नाव देता, त्यांना अटक करणाऱ्यांची नाव देता. त्यांना चौकशीसाठी बोलवता, इथे दीपक केसरकरांना चौकशीसाठी बोलवलं का, तटकरेंना चौकशीसाठी बोलवलं का, रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं का, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवलं का, राधाकृष्ण विखे पाटील यांना चौकशीसाठी बोलवलं का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
अमित शाहांपर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं?
या सर्वांना एकदा विचारा की तुम्ही तिथे का गेला होतात? कोणते विधी केले? त्यातून तुम्हाला काय फायदा झाला? त्याला किती पैसे दिले? पैसे कुठून आणलेत? पोलिसांना जर प्रश्न काढण्यात अडचणी असतील, तर मी त्यांना प्रश्नावली निर्माण करुन देतो. पण सरकार जर पाठीशी नसेल तर अमित शाहांपर्यंत अशोक खरातला कोण घेऊन गेलं? चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला? असे सवालही संजय राऊतांनी केले.
फोटो कोणी कोणाबरोबर काढू शकतो? असं मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. तरीही माझा प्रश्न आहे की अशोक खरातसारखा भोंदू बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कसा पोहोचला? कोणीतरी यात मध्यस्थ आहे. कोणी तरी दलाल आहे जो या सरकारमध्ये आहे. सत्तेमध्ये या भोंदू बाबाला प्रतिष्ठा देत आहे. अशोक खरात मंत्रालयात कसा पोहाचला? तो अनेक मंत्र्यांच्या कामात कसा हस्तक्षेप करत होता? याची माहिती द्या. फक्त त्याचे ते व्हिडीओ पोलीस घेऊन चाललेत. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते नसून महाराष्ट्राच्या प्रतिठेशी संबंधित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
त्या बुवाबाजीचे समर्थन कोणाकडून
गेल्या वर्षभरातील हे गुन्ह्याशी संबंधित चौकशी सुरु आहेत. तिथे अशाप्रकारे जाऊन त्या बुवाबाजीचे समर्थन करत होते. महाविकासआघाडीच्या काळात जे घडलं ते उघड आहे तुम्ही पाणी दिलं असं म्हणताय. पाणी देणं हा गुन्हा आहे का, आता सत्ताधारी जे मंत्री आहेत त्या काळात हे शोषणाचे कांड झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
