Sanjay Raut : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? संजय राऊत यांच्या विधानाने मोठा ट्विस्ट

शरद पवार हे राजकारणातील प्रमुख स्तंभ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतरचे ते प्रमुख स्तंभ आहेत. त्यांच्यासमोर सर्व ज्युनिअर आहेत. लोकांना सत्तेवर बसल्यावर अकलेची शिंगं फुटतात. काही लोक पवार साहेबांना सल्ले देण्याचं काम करतात. हातात सत्ता आहे, म्हणून त्यांना शिंगे फुटली आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : शरद पवार राज्यसभेवर जाणार का? संजय राऊत यांच्या विधानाने मोठा ट्विस्ट
संजय राऊत - शरद पवार
| Updated on: Feb 06, 2026 | 11:50 AM

येत्या 2 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेची टर्म संपणार आहे. या जागी पार्थ पवार हे राज्यसभेवर जाण्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यामुळे शरद पवार यांची राज्यसभेवर जाण्याची वाट अत्यंत बिकट असल्याचं मानलं जात आहे. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आता मोठा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून मोठं भाष्य केलं आहे. पवार साहेबांची निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाविकास आघाडी त्यांना पूर्ण ताकदीने निवडून आणेल. फक्त निर्णय पवार साहेबांनी घ्यायचा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मुख्य राष्ट्रवादी पार्टी ही महाविकास आघाडीचा घटक आहे. बाकी हवाबाजी आहे. शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं आहे. मी पवार साहेबांशी या विषयी अनेकदा बोललो आहे. आमच्या दोघांची चर्चा झाली आहे. एकदा तर उद्धव ठाकरे यांच्यासमोरच बोललो होतो. आता थांबायला पाहिजे अशी पवारांची मानसिकता आहे. पण पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. तुमच्या सारख्या नेत्याने दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज दिल्लीत असणं असं आहे, असं मी पवारांना बोललो होतो, असं संजय राऊत म्हणाले.

लढण्याची इच्छा असेल तर

पवारांनी ठरवलं निवडणूक लढायचं तर आमच्याकडे त्यांना निवडून आणण्याची ताकद आहे. महाविकास आघाडीकडे तेवढी मते जरूर आहेत. त्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कुणापुढे हातपसरण्याची गरज नाही. पवारसाहेबांनी निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे. आघाडी म्हणून आमच्याकडे मतांपेक्षा जास्त कोटा आहे. फडणवीस आणि इतरांनी कितीही अपशकून केला, विशेषत: दिल्लीतून अपशकून झाला तरी तो यशस्वी होणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

ते सरकारने ठरवावं

एप्रिलमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदार निवृत्त झाले तरी एक खासदार निवडून जाईल. निवडणूक बिनविरोध करायची की नाही हे सरकारने ठरवावं. पण पवारसाहेब संसदेत असावे. पवारांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवारांशी बोलणार

रोहित पवार येत्या 9 तारखेला मीडियाला अजितदादांच्या अपघाता संदर्भात माहिती देणार आहेत, असं राऊत यांना सांगण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार हे पवार कुटुंबातील महत्त्वाचे घटक आहेत. ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे. ज्यांच्याकडे माहिती येत असते त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार काही माहिती देत असतील तर महाराष्ट्र ऐकण्यास उत्सुक आहे. मीही मीडियाला काही माहिती दिली. आम्ही दादा प्रेमी आहोत. मी याबाबत स्वत: रोहित पवारांशी बोलणार आहे. मी स्वत: दादांच्या जाण्याने अस्वस्थ आहे, असंही ते म्हणाले.