जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता, तिथेच..संजय राऊतांचे बोचरे शब्द
"काँग्रेसला फक्त 25 मत मिळतील. तुम्हाला 25 लाख मिळतील. पण लोकशाहीत विरोध व्हायला पाहिजे. लोक ठरवतील मत द्यायचं की नाही?"

“महाविश्वगुरुंची हत्यारं काय तर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाच्या उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विद्धवस करण्याचं काम महागुरु करत होते. जागतिक युद्ध थांबवण्याचं श्रेय चीन-पाकिस्तानने घेतलय. शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होता. तिथे तुमचा भाजपाचा झेंडा फडकवणार होता. तिथे ट्रम्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर राज्य करणार आहेत. ही भारतासाठी, मोदी सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. कसले विश्वगुरु तुम्ही, पाकिस्तानला यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. याला जबाबदार मोदी आणि त्यांचं सरकार आहे. भपंक आणि डरपोक” अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
“ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानत असेल तर भारताला, मोदीला मारलेली चपराक आहे. ट्रम्प पाकिस्तान, चीनला थँक्यू म्हणत असतील, तर ही दोन्ही आपली शत्रू राष्ट्र आहेत. मोदी काळातील भारताला मारलेली सगळ्यात मोठी चपराक आहे. मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही” असं संजय राऊत म्हणाले.
तिथून महाराष्ट्राची जनभावना काय सांगता
काँग्रेसने जनभावनेची कदर करुन उमेदवार देऊ नये असं फडणवीस म्हणाले. त्यावर राऊत बोलले की, “जनभावना काय याची व्याख्या त्यांनी सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर उमेदवार देताना जनभावना नव्हती काय?” “पंढरपूरला आमदार भालके यांचं निधन झाल्यानंतर उमेदवार देताना जनभावना नव्हती का?. अशा जनभावना भाजपने पायदळी तुडवल्याची अनेक उदहारण देता येतील. तुम्ही तिथे तामिळनाडूत प्रचारात आहात, तिथून महाराष्ट्राची जनभावना काय सांगता?” असं राऊत म्हणाले.
टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं
पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावरही संजय राऊत बोलले. “शरद पवार, अजित पवार मूळचे काँग्रेसचे आहेत. पार्थ पवारांनी अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे. अजित पवार हे काँग्रेसच प्रोडक्ट आहे. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे. आजही ते काँग्रेस विचारानेच काम करतात. काँग्रेस पक्ष हा या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जगात मान्यता आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री यांची जगात प्रतिष्ठा आहे. काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका कोणी करावी, टीका करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं” असं संजय राऊत म्हणाले.
“पराभव झाला म्हणून लोकशाही मरते असा अर्थ होत नाही. लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. बिनविरोध निवडणूक न करण्याची परंपरा भाजपची आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
