
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. पक्षाच्या संघटना बांधणीकरता प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी संदीप देशपांडे यांच्यासह इतरही पदाधिकारी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू झाली आहे. आज रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
बदलापुरातील खरवई रस्त्यावरील होप इंडिया कंपनी समोर असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. खरवई जलशुद्धीकरण प्रकल्पातून निघणारी ही दोन फुटाची पाईप लाईन काल सकाळी फुटली असून गेल्या 24 तासात या पाईपलाईन मधून शेकडो लिटर पाणी वाया गेलं आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या मधोमध दहा फूट खाली ही पाईपलाईट असल्याने या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामात वेळ लागणार आहे. हा मुख्य रस्ता खोदल्यानंतरच या पाईपलाईनचे काम करण्यात येईल असं जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि पत्नी प्रतिभा पवार रुग्णालयात उपस्थित आहेत.
अमरावती विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून उत्साहात सुरुवात होत आहे. यावर्षी विभागातील ५४३ केंद्रांवरून एकूण १ लाख ५७ हजार २६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत ही प्रक्रिया पार पडेल. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी विद्यार्थी संख्या असून, कॉपीमुक्त परीक्षेसाठी १३० संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही आणि कडक पोलीस बंदोबस्ताचा वॉच ठेवण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीच्या वतीने महापौर पदासाठी नितीन जयराम पाटील आणि उपमहापौर पदासाठी प्रमिला पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडीमुळे पनवेलच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळणार असून, आज जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
बीड शहरात अनिलदादा जगताप फाऊंडेशन आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘चंपावती महोत्सवा’ने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला हा महोत्सव जिल्ह्यातील बालकलाकारांसाठी एक मोठी पर्वणी ठरली आहे. कोरोना काळानंतर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून या उपक्रमाचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आपली प्रतिभा सादर करत आहेत. या महोत्सवाला बीडमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने चंपावती नगरी दुमदुमून गेली आहे.
सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. सध्या महाविकास आघाडीकडे 30 जागा असून सत्तेचा आकडा गाठण्यासाठी केवळ एका जागेची गरज आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी समविचारी पक्षांना आणि नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू, असे विश्वजीत कदम म्हणाले. या विधानामुळे सांगलीच्या स्थानिक राजकारणात आता मोठ्या हालचालींना वेग आला असून, सत्ता स्थापनेसाठी मविआकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह नुकताच निश्चित झाला आहे. रेवती सुळे या प्रसिद्ध उद्योजक आणि विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्याशी विवाहबंधनात अडकणार आहेत. सारंग लखानी हे स्वतः एक यशस्वी व्यावसायिक असून ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत. विशेष म्हणजे, हे लग्न ठरण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या आनंदाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. या हाय-प्रोफाइल विवाहाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
भाजप आणि नियमांचा काहीही संबंध नाही. भाजपला मदत न करण्याची भूमिका ठाकरेंनी घेतली आहे.. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताबाबत राजकीय वर्तुळातून अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यातच आता रोहित पवार यांनी आज मंगळवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.
शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे विजय वडेट्टीवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महापौर पदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी उरला अवघा दीड तास आहे. असं असताना चंद्रपूर मधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आलाय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक दौऱ्यावर आहेत. चांदवड तालुक्यातील जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात दुपारी 3 वाजता पंचपरमेष्ठी मंडपमचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मोहन भागवत हे उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल झाले. बाबासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
ठाण्यातील युवा सेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश अभंगे यांना जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या दोन सराईत आरोपींना कोपरी पोलीस ठाणे यांनी शिताफीने अटक केली. पोलिसांना आरोपींच्या बॅगेतून धारदार चाकू आणि काही हत्यारं सापडली आहेत. जीवे मारण्याचा कट कोणी आणि कशासाठी रचला याचा पुढील तपास कोपरी पोलीस करत आहेत. शिवसेनेत सिद्धेश अभंगे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मंत्रालयाचा सहावा मजला सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. कुंड्या लावून बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ९.३० वाजता सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल होणार आहेत, त्यापूर्वी त्या मुंबईतील सिद्धिविनायक आणि चैत्यभूमीला भेट देणार आहेत. यानंतर त्या विधान भवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्रालयात कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत कवठा गटातून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. देशमुख तब्बल ५,५७० मतांनी विजयी झाले असून मराठवाड्यातील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. तर दुसरीकडे उमरगा तालुक्यातील कदेर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांनीही दमदार कामगिरी करत ६,२९० मतांनी विजय मिळवला आहे.
चंद्रपूर- भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या ताफ्यातील पोलीस वाहन ओव्हरटेक करताना त्याने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. या धडकेत कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना आमदार जोरगेवार रात्री नागपूरहून येत असताना चंद्रपूर जवळील मोरवा या गावाजवळ झाली.
नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्ष नेतेपदावरून स्पर्धा सुरू आहे. पंधरा नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांमध्ये चुरस रंगली असून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय मातोश्री वरून होणार आहे. पक्षाच्या संकट काळात जो सोबत, त्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून सत्तासंघर्ष रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या करेक्ट नियोजनामुळे भाजपच्या तोडीस तोड जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत, जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा असल्याचं स्पष्ट संकेत शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिले आहेत. “जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला, तर मला आनंदच होईल,” असं ठाम मत राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे. या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा आणि कनिष्ठ विद्यालयातील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात कॉपी होऊ नये यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे मंगळवारपासून (10 फेब्रुवारी) राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी 10,664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीची विद्यार्थीसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथकांसह अन्य काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीस देखील त्या उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. यासह राज्य, देश-विदेशातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.