मोठी बातमी! शरद पवारांचे 8 खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींना भेटणार, राजकारणात नेमकं काय घडतंय?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. याबाबत सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी आकरा वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, विकासाच्या चौकटीतले अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे 8 खासदार मोदी यांना भेटणार आहोत. सोमवारी सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे, अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
एफसीआरए बिलाला विरोध
दरम्यान एफसीआरए बिलाला आमच्या पक्षाचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. भारत सरकारला विनंती आहे, घाई करू नका. सरकारने चर्चा केली पाहिजे. चर्चा ही लोकशाही मार्गाने व्हायला हवी. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका चर्चा कारून योग्य मार्ग काढला पाहिजे. आमचे म्हणणे आहे की काही चुकीचे पैसे असतील, ड्रग्सचे पैसे असू शकतात , किंवा काही असेल तर विरोध करा. पण काही लोक जर मदत करणार असेल तर काय समस्या आहे? सगळ्याकडे वाईट नजरेने का बघावे? आम्ही जॉइंट चर्चा करायला तयार आहोत, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी डिलिमिटेशन बिलावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. डिलिमिटेशनचं बिल अजून आलंच नाहीये, आमची रोज सकाळी इडिंया अलायन्सची बैठक पार पडते, चर्चा करूनच आम्ही भूमिका घेतो, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नियम केले, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी नाही, सरकारने असंवेदनशीलपणा दाखवला आहे, हे फक्त निवडणुकीपूर्त आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
