भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला, 14 जणांचा जागीच मृत्यू; देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
14 जणांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील 14 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात झाला आहे.
8 जणांचे मृतदेह सापडले
या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला होती. भाविकांसह पिकअप वाहन या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याचे तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते, त्यामुळे पिकअप थेट पाण्यात गेले आणि या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश
या अपघाताची माहिती समोर येताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांमध्ये 4 लहान मुलांचा आणि 4 महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 2 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली आहे, सर्वजण मदतकार्यात व्यस्त आहेत. माळशिरसचे आमदार उत्तम जाणकर हे सध्या घटनास्थळी पोहचत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेवर बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
