Eknath Shinde : सोलापूरात शिंदे सेनाला सर्वात मोठा दणका; या शिलेदाराचा ‘जय महाराष्ट्र’, काय व्यक्त केली खंत
Shivajirao Sawant : सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकहाती पक्ष बांधणी सुरू केली होती. अनेक दिग्गज नेते त्यांनी खेम्यात आणले होते. पण आता या बांधणीला सोलापूरात पहिला फटका बसला. शिंदे सेनेला या शिलेदाराने जय महाराष्ट्राचा सांगावा धाडला.

सोलापूर, सातारा आणि सांगलीमध्ये शिंदे सेना चांगलीच सक्रिय झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक शिलेदार आपल्याकडे वळवले होते. पक्षाच्या बांधणीचे काम सुरू होते. या शिलेदारांसोबत वीण घट्ट होत असतानाच अंतर्गत मतभेद ही चव्हाट्यावर येत होते. त्यावर वेळीच तोडगा न निघाल्याने आता पहिली विकेट पडली आहे. शिंदे सेनेला सोलापूर जिल्ह्यात पहिला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे सेनेला पहिला झटका
शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात मोठा धक्का बसला. आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंतानी पक्ष पदाचा राजीनामा सोपवला. गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे जिल्हा संपर्क पदावर कार्यरत होते. पण त्यांचे पक्षाशी सूर जुळले नसल्याचे समोर आले. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
काय केली व्यक्त खंत
पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून सावंत यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील निर्णयात विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी याविषयीची तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठीकडे वारंवार तक्रार करुनही दखल घेतली नसल्याने सावंतानी जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या अनेक समर्थकांनी सुद्धा राजीनामे दिले आहेत.
आता भूमिका काय?
शिवाजीराव सावंत यांनी शिंदे गटाला रामराम ठोकल्याने ते कोणता पक्ष जवळ करतात, काय भूमिका घेतात याविषयी राजकीय गोटात चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत यांना मंत्री पद मिळाले नाही. त्यानंतर शिवाजी सावंत यांना गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी आमदार करण्याची मागणी केली होती. सावंत यांनी गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासमोर चांगलेच शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर आता सावंत यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र ठोकला. आता त्यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
