राजकीय भूकंपाने सोलापूर हादरले, शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार; दोन बडे नेते महाविकास आघाडीत

Solapur NCP Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीआधी अनेक मोठे बदल होताना दिसत आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. शरद पवार यांच्या पक्षात येणाऱ्या नेत्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात सोलापुरातील माढ्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर...

राजकीय भूकंपाने सोलापूर हादरले, शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार; दोन बडे नेते महाविकास आघाडीत
शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: Facebook
| Updated on: Sep 05, 2024 | 12:05 PM

विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटालांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

मोहिते पाटलांचा बबनराव शिंदेंना धक्का

सोलापूरच्या टेभुर्णीत आमदार बबनराव शिंदेंना विजयसिंह मोहिते पाटलांनी राजकीय धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केला आहे. विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. परिवर्तनाची तुतारी माढ्यात वाजणार असल्याचा निर्धार देशमुख बंधूंनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे गटाच्या नेत्याचा शिवसेनेला रामराम

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डी. एस. सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्हात पहिला झटका बसला आहे. आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे पक्ष सोडला आहे, असा गंभीर आरोप डी. एस. सावंतांनी केला आहे. राज्याचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्हातले पदाधिकारी, आमदार हे व्यवस्थित वागत नाहीत. त्यांची वागणूक व्यवस्थित नसल्याने शिवसेनेतून बाहेर पडलो आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

शहाजीबापू पाटलांवर आरोप

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांचा जिल्हात समन्वय नाही. त्याच्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलोय. माझा फक्त ट्रेलर होता. मी पहिले पाऊल टाकले असून येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश होतील. अनिल सावंताना पंढरपूर मंगळवेढ्याचे तिकीट मिळणार असेल तर चांगला चेहरा पंढरपुरला मिळेल. त्यांना पक्षात आणण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. येत्या काही दिवसांतच अनिल सावंताचा देखील निर्णय समोर येईल, असं डी. एस. सावंत म्हणालेत.