तळीयेतील दरडग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या ‘म्हाडा’च्या घरांना शिवसेना आमदाराचा विरोध, कारण काय?
म्हाडाची घरं ही 300 ते 400 फुटांची असतात. ती घरं ग्रामीण भागातील कुटुंबांना कशी चालणार? असा सवाल गोगावले यांनी केलाय. शिवसेना आमदारानंच म्हाडाच्या घरांना विरोध केल्यामुळे आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, हे पाहावं लागणार आहे.
रायगड : 22 जुलैला डोंगरकडा काळ बनून कोसळलेल्या तळीयेतील दरडग्रस्तांना म्हाडाकडून घरं बांधून दिली जाणार आहेत. तशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र, दरडग्रस्तांना दिलेल्या जाणाऱ्या म्हाडाच्या घरांना आता शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी तीव्र विरोध केलाय. म्हाडाची घरं ही 300 ते 400 फुटांची असतात. ती घरं ग्रामीण भागातील कुटुंबांना कशी चालणार? असा सवाल गोगावले यांनी केलाय. शिवसेना आमदारानंच म्हाडाच्या घरांना विरोध केल्यामुळे आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, हे पाहावं लागणार आहे. (MLA Bharat Gogavale opposes giving small houses of MHADA to Landslide affected citizens in Taliye)
दरम्यान, गाव-खेड्यातील शेतकरी कुटुंबांना भात, गवत, नाचणी अशा धान्याची घरातच साठवणूक करावी लागते. तसंच पडवी, पसरात गाय, म्हशी, शेळ्या, कोंबड्याचं पालन केलं जातं. घरात दोघे-तिघे भाऊ असतात. त्यांचं कुटुंब असतं. आई-वडिलांसह राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाला छोट्या घरात राहणं जमणार नाही. त्यामुळे म्हाडाला आणि सरकारला विनंती आहे की, गावातील घराप्रमाणेच मोठी घरं द्यावीत अशी मागणी आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. महाडमधील चवदार तळे स्वच्छता अभियानाची पाहणी करताना गोगावले यांनी ही मागणी केलीय.
दरडग्रस्त कुटुंबियांना तात्पुरत्या कंटेनर हाऊसची प्रतिक्षा
तळीयेतील कोंडाळकरवाडीत दरड कोसळल्यामुळे घरं उद्ध्वस्त झालेल्या 24 कुटुंबांना 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी कंटेनर हाऊसचं वाटप होणार होतं. मात्र, 15 ऑगस्ट उलटून चार दिवस लोटल्यानंतरही कंटेनर हाऊन न मिळाल्यानं दरडग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता 22 ऑगस्ट रोजी सर्व दरडग्रस्तांना कंटेनर हाऊस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. आम्ही किती दिवस नातेवाईकांकडे राहायचं? असा सवाल या दरडग्रस्तांनी केलाय.
जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीयेतील दरडग्रस्त कुटुंबांना म्हाडाची घरं देण्याची घोषणा केली होती. ‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती’, असं ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाने घेतलेल्या जबाबदारीची माहिती दिली होती.
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
इतर बातम्या :
आधी नारायण राणेंकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, आता शिवसैनिकांकडून शुद्धीकरण!
MLA Bharat Gogavale opposes giving small houses of MHADA to Landslide affected citizens in Taliye