ठरलं, महापौर पदाचा वाद अखेर मिटला, गुप्त बैठकीत भाजपा-शिवसेनेचा तोडगा
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणूकांचा निकाल लागला असून त्यात २३ महानगर पालिकेत महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा आला आहे.

भाजपाचा अश्वमेध उधळून राज्यातील २९ महानगर पालिकेच्या निवडणूकांमध्ये किमान २३ महानगर पालिकेत महायुतीची सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील महानगर पालिकेच्या निवडूकांत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजपाचा मुंबई महानगर पालिकेत महापौर केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगर पालिकेत महायुतीला बहुमत मिळाले आहे. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांना काल अचानक वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलात हलवल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यातच आता पक्ष श्रेष्टींच्या निर्णयानंतर मुंबईतील तंटा मिठण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महानगर पालिकाचे महापौर पद मानाचे असल्याने मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून कोणाला मान मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यातच सलग २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या अविभक्त शिवसेनेचा महापौर मुंबई महानगर पालिकेत विराजमान झाला होता. आता मुंबईच्या शेजारील कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेत महापौर कोणाचा होणार याचा फैसला होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात गुप्त बैठक झाली आहे. या गुप्त बैठकीत उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेबाबत चर्चा झाली आहे.
घोडेबाजाराला ऊत
कल्याण – डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक एकत्र लढवूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये महापौर कोणाचा यावरुन स्पर्धा सुरू झाली आहे. याठिकाणी भाजपने ५१ जागांवर विजय मिळविला. तर शिंदे गटाने ५४ जागांवर यश मिळवले. येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षांचे ११ नगरसेवक जिंकले आहेत. या पालिकेत बहुमतासाठी ६३ जागांची आवश्यकता असून महापौरपदाचे गणित जमविण्यासाठी शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे मुंबईत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या १२ नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत मुंबई महानगर पालिकेत महापौर निवडणूक तटस्थ रहाण्याची तयारी दर्शविली असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यात म्हटले आहे.
उल्हासनगरमध्ये सत्ता येणार ?
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि स्थानिक आघाडी एकत्र लढली होती, उल्हासनगरात भाजपला ३८ आणि शिवसेनेला ३६ जागा मिळाल्या आहेत. येथेही सरकार स्थापण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
